जळगाव मिरर । १९ ऑक्टोबर २०२२
जळगाव शहरासह परिसरात वाहने जाळण्याचा प्रकार अजूनही सुरूच असून सोमवारी मध्यरात्री ३ वाजता रामदास कॉलनीसह प्रभात कॉलनी येथे घराबाहेर उभ्या केलेल्या दोन कार अज्ञात माथेफिरूने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली. यात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी वाहनमालकांच्या तक्रारीवरून मंगळवारी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, रामदास कॉलनी येथील यश जतीन गांधी यांनी सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांची कार (एमएच. १९. सीयू, ७३४८) ही घराच्या कंपाऊंडमध्ये उभी केली होती. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात माथेफिरूने ही कार पेट्रोल टाकून पेटवून दिली. मध्यरात्री ३ वाजता यश यांच्या आईला जाग आली. त्यांना घराबाहेर पाहिल्यावर त्यांना कार जळताना दिसून आली. त्यांनी लागलीच मुलगा यश याला उठवून त्याला कारला आग लागल्याचे सांगितले. मात्र तोपर्यंत आगीत कारचे चौदा ते पंधरा हजार रुपयांचे नुकसान झालेले होते. नंतर मंगळवारी दुपारी यश यांनी रामानंदनगर पोलीस ठाणे अज्ञात माथेफिरूविरुद्ध तक्रार दिली त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान, प्रभात कॉलनीतील महिपाल बोहरा यांची एमएच १९ सीयू १९३ क्रमांकाची कारसुद्धा माथेफिरून पेटवून दिल्याचा प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला. या वाहनाचे देखील पाच ते सह हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.