जळगाव मिरर | ६ जून २०२५
गेल्या दोन आठवड्यापासून जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना नियमित सुरु असतांना आता महामार्गावरुन जात असतांना रिक्षाचा एक्सल तुटून रिक्षा उलटली. या अपघातात कंपनीत जात असलेले वसीम खान ईस्माईल खान (वय ३२, रा. शिवाजी नगर, भुसावळ) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना बुधवारी दुपारच्या सुमारास त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना नशिराबादजवळ घडली होती. यावेळी मयताच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात एकच आक्रोश केला.
सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ येथील शिवाजी नगरात राहणारे वसीम खान ईस्माईल खान हे एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरीस होते. दररोज ते भुसावळ येथून जळगावला येत होते. बुधवारी नेहमीप्रमाणे सकाळी वसीम हे भुसावळ येथून जळगाव जाण्यासाठी एका रिक्षात बसले. भुसावळकडून जळगावच्या दिशेने प्रवासी घेऊन येणारी हि ऑटो रिक्षा (क्रमांक एमएच.१९. बीजे ५४३१) नशिराबाद शहराकडे जाणाऱ्या समांतर रस्त्यावर आली असता अचानक रिक्षाचे पुढील चाकाचे एक्सेल तुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुटून रिक्षा उलटली. रिक्षा उलटून झालेल्या अपघातात वसीम खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून ते जखमी झाले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर इतर २ प्रवासी जखमी झाल्यामुळे त्यांना नशिराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होत. वसीम खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना सायंकाळच्या सुमारास त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, २ मुले, २ भाऊ असा परिवार आहे.




















