
जळगाव मिरर | २१ जून २०२६

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदारांच्या कथित बंडखोरीच्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली असतानाच, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याभोवती घडणाऱ्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षातील मतभेद आणि संभाव्य राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने ओमराजे यांची मनधरणी करण्यासाठी मध्यरात्री पुण्यात गुप्त भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कथित बंडखोर खासदारांपैकी काही जण दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याच्या चर्चा सुरू असताना, खासदार ओमराजे निंबाळकर हे पुण्यात आपल्या निवासस्थानी आहेत. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालानंतर ते पुण्यात परतले असून, त्यांनी अद्याप कोणताही अंतिम राजकीय निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. कार्यकर्ते आणि समर्थकांशी चर्चा करून पुढील दोन ते तीन दिवसांत आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, ओमराजे यांना पक्षात कायम ठेवण्यासाठी ठाकरे गटाने प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केल्याचे दिसून आले. ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी मध्यरात्री पुण्यातील ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. ही भेट अत्यंत गोपनीय पद्धतीने झाल्याची चर्चा असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, ओमराजे निंबाळकर यांची भूमिका सध्याच्या परिस्थितीत अत्यंत निर्णायक ठरू शकते. जर ठाकरे गटाला त्यांची नाराजी दूर करण्यात यश आले, तर कथित बंडखोर गटाचे संख्याबळ कमी होऊ शकते. त्यामुळे पक्ष नेतृत्वाकडून ओमराजे यांना पक्षातच कायम ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे बोलले जात आहे.
या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना वरुण सरदेसाई यांनी सांगितले की, “पवनराजे हत्या प्रकरणाचा निकाल निंबाळकर कुटुंबाच्या अपेक्षेप्रमाणे लागलेला नाही. त्यामुळे कुटुंबाची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठी आम्ही पक्षाच्या वतीने भेट दिली. ओमदादा हे पक्षाचे ज्येष्ठ आणि महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी पक्षाकडून आमदार आणि तीन वेळा खासदार म्हणून काम केले आहे. अनेक विषयांवर आमची चर्चा झाली, मात्र प्रत्येक गोष्ट सार्वजनिक करण्याची गरज नसते.”
ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील भूमिकेकडे आता केवळ धाराशिवच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांत त्यांच्या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





















