जळगाव मिरर / ३ मे २०२३ ।
गरिबांच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्या तीन दुकानांचे परवाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी अखेर रद्द केले आहेत. तालुक्यात भिलाली, एकलहरे आणि भरवस येथील रेशन दुकानांचा समावेश आहे. तालुक्यातील एकलहरे, भरवस आणि भिलाली येथील रेशन दुकानदारांनी गरिबांच्या धान्याचे वाटप न करता सर्व माल हडप करण्यासाठी त्याचा साठा करून ठेवला होता. याबाबत प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी तहसीलदार आणि पुरवठा निरीक्षक यांना या दुकानांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते
त्यानंतर लगेच या दोन्ही अधिकाऱ्यांनी त्या-त्या गावांत जाऊन दुकानांची तपासणी केली होती. त्यात भिलाली येथील सुनील भास्कर पाटील यांच्या दुकान क्रमांक ८४ येथे ४.६१ क्विंटल गहू व २१.७९ क्विंटल तांदूळ, एकलहरे येथील रत्नाबाई सयाजीराव पाटील यांच्या दुकान क्रमांक ८२ येथे १०.१७ क्विंटल गहू आणि १.८७ क्विंटल तांदूळ, भरवस येथील अशोक विनायक पाटील यांच्या दुकान क्रमांक ६९ मध्ये १५.८८ क्विंटल गहू आणि ३१.७ क्विंटल तांदूळ जास्तीचा आढळून आला होता.
या दुकानांचा रीतसर पंचनामा करण्यात आला. यात दुकानदारांनी साठवून ठेवलेला हा माल त्यांनी लाभार्थीना वाटप न करता तो काळ्याबाजारात विक्रीसाठी साठ्विल्याचे उघड झाले. याबाबतचा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार या तिन्ही दुकानदारांची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी जळगाव येथे सुनावणी घेतली. त्यात त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे अखेर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या तिन्ही दुकानांचे परवाने रद्द केल्याचे आदेश महाराष्ट्र अनुसूचित वस्तू वितरणाचे विनियमन आदेश १९७५मधील खंड ३(४) नुसार काढले आहेत.