जळगाव मिरर | ८ ऑगस्ट २०२५
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावर मिश्किल पण स्पष्ट भाष्य करत सर्वसामान्यांना विचार करायला भाग पाडले. व्यक्तिशः घेतलेल्या अनुभवाचा उल्लेख करत त्यांनी वाढत्या लोकसंख्येच्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली.
“मी एका भगिनीला विचारलं, ‘एक मुलगी इथे आहे, दुसरी कुठे आहे?’ तर ती म्हणाली, ‘आईकडे ठेवली आहे.’ दोन मुली असूनही ती गरोदर होती. विचारल्यावर म्हणाली, ‘पोटात आहे.’ मी तिला हात जोडून सांगितलं, ‘आता बास करा!’”, असं सांगत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला.
ते पुढे म्हणाले, “मी दुसऱ्या महिलेला विचारलं, ‘किती मुलं आहेत?’ ती म्हणाली, ‘तीन आहेत, आता चौथं काय होईल माहीत नाही!’ मग मी म्हणालो, वरून ब्रह्मदेव जरी आला, तरी जर लोकसंख्या वाढीचा कार्यक्रम असाच चालू राहिला, तर उद्या तुम्ही सरकारमध्ये प्रमुख झाला तरी यावर उपाय शक्य नाही.”
यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “प्रत्येकाने आपापल्या स्तरावर जबाबदारीने विचार करायला हवा. मुलगा असो वा मुलगी, दोन अपत्यांवर थांबायला शिका.”
ते पुढे म्हणाले, “दोन अपत्यांचा कायदा आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती) लागू केला आहे. मात्र लोक विचारतात की खासदार-आमदारांसाठी का नाही? तर मी स्पष्ट सांगतो, ते आमच्या अधिकारात नाही. अधिकार मिळाले, तर त्यावर नक्की विचार करू.”




















