
जळगाव मिरर । १८ नोव्हेबर २०२२
राज्यातील महामार्गावर सुरु असलेल्या अपघाताची मालिका सुरू असतांना आज पुन्हा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या दिशेने निघालेल्या या कारला एका वाहनाने धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाला आहे. मृतांची आणि जखमींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
बोरघाटात झालेल्या या अपघातात पाच जण मृत्यूमुखी पडले असून तिघे जण जखमी झाले आहेत. इर्टिगा गाडीला दुसऱ्या वाहनाची धडक बसल्याने हा अपघात झाला. या धडकेमुळे गाडी रस्त्याकडेला जाऊन पडली आणि दरवाजा तुटल्याने प्रवासी बाहेर पडले. अति रक्तस्त्रावामुळे काहींचा मृत्यू झाला. सगळे मृत व्यक्ती एकाच कुटुंबातले असल्याचे प्राथमिक माहिती हाती येत आहे. जखमींना पनवेलमध्ये एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याच महामार्गावरुन जाणाऱ्या व्यक्तीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली आणि जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं. या चालकाचं नाव मच्छिंद्र आबोरे असून ते पिंपरी चिंचवडचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.





















