
जळगाव मिरर । २२ नोव्हेबर २०२२
प्रेमाच्या आहारी गेल्याने टोकाचे पाऊल उचलत गजाननने स्वत:सह संशोधक मैत्रीण पूजा साळवे (२८, रा. दहेगाव, ता. सिल्लोड) हिला पेटवून आयुष्याची राखरांगोळी केली व कुटुंबीयांच्या स्वप्नांवर पाणी फेरले.सोमवारी दुपारी २.१५ वाजता गजाननने पूजाच्या कॉलेजमध्ये जाऊन प्राध्यापिकेसमक्ष स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतले व पूजालाही कवेत घेतले. यात गजानन ९५ टक्के, तर पूजाही ४० टक्के भाजली. रात्री उशिरा गजाननचा मृत्यू झाला, तर पूजावर उपचार सुरू आहेत.
जिंतूर तालुक्यातील दाभादिग्रस या छोट्याशा गावातून आलेला गजानन खुशाल मुंडे (३०) पीएचडी करत होता. विद्यापीठ वसतिगृहात राहायचा. गावातील सर्वात हुशार मुलगा. कुटुंबीयांनी पोटाला चिमटा देऊन शिकायला शहरात पाठवले. सहा महिन्यांपूर्वीच स्पोर्ट्स बाइक घेऊन घेऊन दिली. आपला मुलगा ‘डॉक्टर’ होऊन चांगली नोकरी करेल, घराण्याचे नाव उज्ज्वल करेल, अशी स्वप्ने शेतकरी आई-वडील रंगवत होते.
‘पूजाने माझ्याशी लग्न केले, नंतर विश्वासघात केला. मी तिच्यावर आतापर्यंत दोन ते अडीच लाख रुपये खर्च केले. असे असतानासुद्धा ती माझ्यासोबत राहत नाही. मला टाळते. पोलिसांकडे तक्रार केली. माझ्या खऱ्या प्रेमाला ती ओळखू शकली नाही. आता आपणही जगायचे नाही अन् तिलाही जिवंत ठेवणार नाही असा निर्णय घेत हे पाऊल मी उचलले,’ असा जबाब गंभीर भाजलेल्या गजाननने पोलिसांना दिला.
पूजा व गजानन दोघेही जीवभौतिकशास्त्र या एकाच विषयात पीएचडी करतात. गुणवत्तेच्या आधारे दोघांनाही फेलाेशिप मिळणार होती. असे असताना गजाननने उचललेले हे टोकाचे पाऊल मित्रांना आणि प्राध्यापकांना धक्का देणारे ठरले. त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा व गजानन या दोघांमध्ये आधी मैत्री होती, पण काही महिन्यांपासून बिनसले होते. गजानन हुशार होता. त्याने इतर विषयांत लक्ष न देता संशोधकावर लक्ष केंद्रित करावे यासाठी प्राध्यापकांनी त्याची समजूतही काढली होती. मी सगळं विसरलो आहे, असे तो सगळ्यांना सांगायचा. पण कायम टेन्शनमध्ये असायचा. काही दिवसांपूर्वी त्याने ‘ओळखीचा चांगला वकील आहे का?’ अशी विचारणा एका मित्राकडे केली होती. याच मानसिक तणावातून त्याने विद्यापीठ परिसरात यापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
४० टक्के भाजलेल्या अवस्थेतील पूजाचा पोलिसांनी जबाब घेतला. तिने सांगितले, ‘माझी इच्छा नसताना गजानन पाठलाग करायचा. माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. मी वारंवार त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने एकले नाही. त्यामुळे मी पोलिस ठाण्यात गेले.’ दरम्यान, पूजाच्या नातेवाइकांनी रात्री उशिरा बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावर कारवाई सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. कलम ३०७ नुसार यात गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. शेतकरी कुटुंबातून आलेली पूजाही सहा बहिणीत सर्वात हुशार आहे. पीएचडी झाल्यानंतर तिला प्राध्यापकाची नोकरी लावण्यासाठी मी मंत्री अब्दुल सत्तार यांना विनंती देखील केली होती, असे तिच्या आईने हंबरडा फोडून सांगितले.
मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आपली गाडी होस्टेलवर लावून गजानन मित्राच्या दुचाकीवर पूजाच्या कॉलेजमध्ये गेला होता. सोबत एक पिशवीही होती. पंपावर बाटलीत पेट्राेल दिले जात नाही. त्यामुळे त्याने आपल्या दुचाकीतून दोन बाटल्या भरून पेट्रोल काढले असावे, टाकी रिकामी झाल्यामुळे मित्राच्या दुचाकीवर त्यान पूजाचे कॉलेज गाठले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. पूजाने पोलिसांत तक्रार दिल्यापासून गजानन जास्तच अस्वस्थ होता. इकडे पोलिस त्याच्यावर कारवाई करेपर्यंत तू कॉलेजला जाऊ नको, असे पूजाच्या कुटुंबीयांनी तिला सांगितले होते. पूजाला पाच बहिणी आहेत. तिचे वडील देखील शेतकरी होतेे. मात्र काही महिन्यांपूर्वीच ते वारले. मोठा भाऊ शेती करतो. तिच्या आईलाही मुलीकडून खूप अपेक्षा होत्या.




















