जळगाव मिरर | ४ डिसेंबर २०२३
राज्यात मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील नुकतेच जळगावात त्यांनी सभा घेत आरक्षण मिळवून देण्याची भूमिका घेतल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी यावर वक्तव्य केले आहे. ते संगमनेर येथे बोलत होते.
मंत्री महाजन म्हणाले, ”मराठा आरक्षण प्रकरणी सरकार गंभीर आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्वत: लक्ष घालत आहे. मनोज जरांगेची सरसकट प्रमाणपत्र मिळावे ही मागणी ही शक्य नाही. मी स्वत: ज्यावेळी त्यांच्या भेटीसाठी गेलो त्यावेळी मी त्यांना या संदर्भात सांगितले आहे. आतापर्यंत जेवढ्या कुणबी नोंदी मिळल्या त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण कसे देणार? असा सवाल देखील महाजन यांनी यावेळी उपस्थित केला.
पुढे महाजन म्हणाले, ”मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही, या संदर्भात आम्ही सु्प्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टातून याचा मार्ग निघणार आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण आम्हाला द्यायचे आहे. हे मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितले आहे. त्यातून नक्कीच मार्ग निघेल. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यात सरकार यशस्वी ठरेल, अशी मला खात्री आहे” असा विश्वास देखील महाजन यांनी व्यक्त केला.