जळगाव मिरर | ४ जुलै २०२५
गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठी अस्मितेचा मुद्दा तापलेला असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात ‘जय गुजरात..’चा नारा देत राजकीय वादाला तोंड फोडले आहे. कोंढवा येथील जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत शिंदे बोलत होते.
नेहमीप्रमाणे अमित शाह यांचे कौतुक करताना शिंदे यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ असे म्हणत भाषण संपवले. मात्र, अचानक त्यांना काही आठवले आणि पुन्हा माइकवर येत त्यांनी ‘जय गुजरात..’चा नारा दिला. या घोषणेने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले.
या कार्यक्रमाला अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अनेक मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंदे यांनी आपल्या भाषणात बाजीराव पेशव्यांचा पराक्रम आणि अमित शाह यांचे नेतृत्व यांचे तोंडभरून कौतुक केले. पण भाषणाच्या शेवटी ‘जय गुजरात’चा नारा दिल्याने सर्वांचे लक्ष शिंदे यांच्याकडे वळले.
मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून आधीच वातावरण तापलेले असताना, शिंदे यांच्या या वक्तव्याने विरोधकांना आयते कोलित मिळाले आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या घोषणेवरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, “मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही. कारण महाराष्ट्र द्रोही निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या अस्मिता दिल्लीश्वरांच्या पायथ्याशी वाहिल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचे बक्षीस मिळाले आहे. त्यामुळे ते बक्षीस मिळाल्याने आपण सगळ्यात अतिउत्तम लाचार कसा? हे दाखवण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे.
ज्या पद्धतीने अजित पवारांनी सर्व ताब्यात घेतलेले आहे आणि एका अर्थाने शिंदे हे बऱ्यापैकी वेगळे झालेले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाहात येण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांना हे सगळं बोलणे गरजेचे आहे. या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट होते की, जिथे राज्याचा मुख्यमंत्रीपद भूषवलेली व्यक्ती जय गुजरात.. म्हणते, तिथे सुशील केडिया सारख्या व्यक्तींनी मी मराठी बोलणार नाही, काय करायचे ते करून घ्या? हा उन्नतपणा त्यांच्या ठायी येणे फार स्वाभाविक आहे.
जे या प्रदेशाच्या अस्मितेला नख लावण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याशी आपण कसं वर्तन व्यवहार ठेवायचं, हे इथल्या मराठी जनतेला ठरवावे लागेल. भाजपने ज्या पद्धतीने नो हिंदी नो बिझनेस, असा ट्रेंड चालवला. आता इथल्या मराठी माणसाने नो मराठी नो कॉपोरेशन, नो मराठी नो बिझनेस, नो मराठी नो कनेक्शन, नो मराठी नो वोटिंग, हा ट्रेंड आता आम्हाला चालवावा लागणार आहे आणि आता तो प्रत्येक मराठी माणसाला चालवावा लागणार आहे.
“केम छो एकनाथ शिंदे साहेब” – जितेंद्र आव्हाड
एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातच्या घोषणेनंतर राज्यातील विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आता शिंदे साहेबांसोबत कसं बोलायचं? केम छो एकनाथ शिंदे साहेब.., असं म्हणत डिवचलं आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी. शिवसेना मराठी माणसासाठी उभी केली होती. या सगळ्यातून एकच म्हणावं वाटतं विनाशकाले विपरीत बुद्धी असंही पुढे ते म्हणालेत.
