
जळगाव मिरर | २२ एप्रिल २०२६
मुंबईतील वरळी येथे महायुतीच्या ‘आक्रोश मोर्चा’दरम्यान निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीमुळे संतप्त झालेल्या एका सामान्य महिलेने राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना जाहीरपणे सुनावल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका सुरू केली आहे.
महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर न झाल्याच्या निषेधार्थ महायुतीच्या वतीने २१ एप्रिल रोजी वरळीत ‘जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमल्यामुळे दुपारच्या सुमारास वरळी आणि परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली. दुपारी १ वाजेच्या सुमारास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
याच दरम्यान वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका महिलेचा संताप अनावर झाला. तिने थेट मंत्री गिरीश महाजन यांना उद्देशून नाराजी व्यक्त करत त्यांना सुनावले. “इथून चालते व्हा” अशा शब्दांत व्यक्त झालेला तिचा रोष कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही वेळातच तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या घटनेनंतर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत भाजपच्या आंदोलनावर टीका केली. “भाजपच्या फोकनाड घोषणांपेक्षा सामान्य महिलेचा ‘इथून चालते व्हा’ हा एकच आवाज अधिक प्रभावी ठरला. इव्हेंटबाजी करताना सामान्य नागरिकांच्या अडचणींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले,” असा आरोप त्यांनी केला.
वडेट्टीवार यांनी पुढे म्हणताना, “एकीकडे महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण करायचे आणि दुसरीकडे रस्ते अडवून नागरिकांना वेठीस धरायचे, ही कसली आंदोलनाची पद्धत?” असा सवालही उपस्थित केला. भाजपच्या ‘इव्हेंट पॉलिटिक्स’ला मुंबईकर महिलेने वास्तवाचा आरसा दाखवल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, या घटनेमुळे आंदोलनाच्या पद्धतीवर आणि त्यातून होणाऱ्या नागरिकांच्या गैरसोयीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सामान्य नागरिकांच्या भावना लक्षात न घेता केलेल्या आंदोलनांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर प्रशासन आणि राजकीय पक्षांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.






















