
जळगाव मिरर / १६ ऑक्टोबर २०२२
शहरात बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल झाल्यानंतर त्या परिसरातील नागरिकांची एक मोठी समस्या सुटल्यानंतर दुसऱ्या एका मोठ्या समस्येला नागरिकांना जावे लागत आहे. याचाच प्रत्यय नागरिकांना नेहमी येत आहे, ज्या वेळेस उड्डाणपुलाचे काम सुरु असताना नागरिक तहसील कार्यालजवळील रेल्वे रुळावरून क्रॉस करत असताना या मध्ये दुरदैवाने एका तरुणीचा जीवही गेला होता. तशीच परिस्थिती पुन्हा येऊन ठेपली आहे.
शहरात बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल झाल्यानंतर या प्रभागातील नगरसेवक मोठ्या जोशात येत पुलाचे काम आम्हीच केले या तोऱ्यामध्ये येत आपला पाठपुरावा कामी आल्याचे सांगत गावभर हिंडत होते. पंरतु या पुलाच्या पाठपुरावा कुणी केला व कधीपासून केला हे नागरिकांना चांगलेच ठाऊक आहे, त्यामुळे फुकट श्रेय घेणाऱ्या नगरसेवकांना हि समस्या हि दिसली पाहिजे. आता रेल्वे प्लॅटफॉर्म पाच-सहावरून शिवाजी नगरकडे जाण्यासाठी दादर नसल्याने नागरिक आजही पुन्हा रेल्वे रुळावरून क्रॉस करून जात आहे. यामुळे कुणाचा दुदैवाने जीवही जाऊ शकतो. सध्या सहाव्या प्लॅटफॉर्मवर रूळ टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे शिवाजीनगरकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना स्थानकावरून जाण्या-येण्यास मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे.
जळगाव रेल्वेस्थानकात सहाव्या प्लॅटफॉर्मसाठी रूळ टाकले जात आहे. जमीन समतोल झाल्यानंतर येथे सिमेंटचे स्लीपर व त्यावर रूळ टाकले जात आहेत. या कामांमुळे प्रवाशांना व रहिवाशांना येथून बाहेर पडण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ज्या प्रवाशांना शक्य होते ते हा अडथळा पार करत जातात. शिवाजीनगरकडे जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे; मात्र सहाव्या प्लॅटफॉर्मसाठी सुरू असलेल्या कामामुळे येथून बाहेर पडण्यास प्रवाशांना व नागरिकांना मोठ्या अडचणी येत आहे. यात ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांना येथून जाणे शक्य होत नाही.




















