जळगाव मिरर | १७ एप्रिल २०२४
जळगाव शहरात शिकत असलेल्या खेड्यांवरील विद्यार्थ्यांसाठी बस ही एक महाविद्यालयांशी जोडणारी दुवा असून गेल्या काही दिवसापासून महामंडळाने आजूबाजूच्या खेड्यावरील बसेस बंद केल्याचे आढळून आले. जसे की धारशेरी,वंजारी खपाट या गावावरील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शहरात शिक्षणासाठी येत असतात.मात्र अचानक महामंडळाने बसेस कमी केल्यामुळे परीक्षेच्या वेळेस विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
या विषयाची चौकशी विद्यार्थी महामंडळाच्या कार्यालयात करण्यास गेले असता तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले की बस बंद करण्याचा जीआर वरतून आलेला आहे.तुम्ही काहीही करा बस सुरू होणार नाही. तर विद्यार्थ्यांनी या महिन्यासाठी लागणारी पास देखील अगोदरच घेतलेले असून त्यांचे आर्थिक व शैक्षणिक व मानसिक नुकसान बस महामंडळ करत आहे असे दिसून येत आहे.या विषयाची माहिती विद्यार्थ्यांनी तात्काळ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना दिली असता महानगर सहमंत्री भाविन पाटील यांनी बस महामंडळाच्या कार्यालयास सर्व विद्यार्थ्यांसह भेट देत लवकरात लवकर बस सेवा पूर्ववत करण्यात यावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या रोशाला आपणास सामोरे जावे लागेल असा इशारा दिला.प्रसंगी शहरात शिकत असलेले बरेच विद्यार्थी उपस्थित होते.