जळगाव मिरर | १० जानेवारी २०२४
देशातील अनेक राज्यात गुन्हेगारी घटना नियमित घडत आहे. यात प्रेमविवाहाच्या घटनामधून देखील गुन्हेगारी वाढत आहे. नुकतेच प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून भावाने वडिलांच्या मदतीने बहिणीसह भाऊजीची गोळ्या झाडून हत्या केली. इतकंच नाही, तर त्याने दीड वर्षाच्या भाचीचा देखील खून केला. हत्येनंतर दोघेही फरार झाले. अंगावर काटा आणणारी ही घटना बिहारच्या नवगचिया जिल्ह्यातील नवतोलिया गावात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. यात चंदन कुमार (वय 40), चंदा कुमारी (वय 28) आणि रोशनी कुमारी (वय दीड वर्ष) अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर प्रमोद सिंग उर्फ पप्पू सिंग आणि त्यांचा मुलगा धीरज सिंग अशी आरोपी बाप-लेकांची नावे आहेत. सध्या दोघेही फरार असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवतोलिया गावात राहणाऱ्या चंदा देवीचे आपल्याच गावातील चंदन कुमार या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. २०२१ मध्ये दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर दोघांना एक गोंडस मुलगी झाली. मुलीच्या जन्मानंतर कुटुंबीय आपला स्वीकार करतील या आशेने दोघेही गावी परतले. मात्र, बहिणीने प्रेमविवाह केल्याचा राग चंदा देवीचा भाऊ धीरज सिंग याच्या मनात होता. त्याने वडिलांसोबत बहिणीच्या हत्येचा कट रचला.
मंगळवारी दुपारी दोघेही चंदन कुमार याच्या घरी गेले. तिथे जाताच आरोपी धीरज सिंग याने बहिणीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वॉर केला.त्यानंतर धीरजने भाऊजीवर देखील गोळी झाडली. इतकंच नाही, तर आरोपींनी दीड वर्षाच्या चिमुकलीची देखील हत्या केली. दरम्यान, या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. शेजारच्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. फरार झालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.