अमळनेर : विक्की उत्तम जाधव
कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वच संचालक सत्ताधारी असून सत्ताधारी व विरोधक असा विषयच नसल्याने गटातटचा प्रश्नच येत नाही, असा दावा सभापती अशोक आधार पाटील यांनी केला.मात्र गेल्या काळात मार्केटमधील गाळे लिलावात अनियमित कारभार झाल्याचा भांडाफोड करीत यासाठी चौकशी समिती नेमण्याचा ईशारा त्यांनी दिला आहे.
बाजार समितिबाबत काहींनी उलटसुलट प्रचार सुरु केल्याने यासंदर्भात खरी परिस्थिती मांडण्यासाठी अशोक पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. त्यांत नमूद केले की, ना.अनिल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सभासदांनी त्यांच्या पॅनलला बहुमत दिले. त्यानंतर राज्यात झालेल्या घडामोडींमुळे विरोधातील संचालकदेखील कृउबात सहयोगी झाले आहेत. मी सभापती झालो तेंव्हापासून आम्ही पाच सहा महिन्यांतच कारभाराची पद्धत बदलून त्यात पारदर्शकता आणली आहे. प्रत्येक महिन्याला अजेंड्यावर येणारे विषय, त्यावर सविस्तर चर्चा, प्रत्येक महिन्यात खर्च झालेल्या रुपयांन रुपयाचे वाचन करुन मंजूर केले जाते. अल्पावधीतच याठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नसतांना आम्ही शेतकरी, हमाल माथाडी ,व्यापारी आदि सर्वांसाठी आर.ओ.चे शुद्ध व थंडगार पाणी
स्वखर्चाने उपलब्ध करुन दिले. मुख्य प्रवेशद्वार ला बळीराजा नामकरण करुन शेतकऱ्यांना सन्मान दिला, शेतकऱ्यांचा मोफत पिक विमा तो देखील मार्केटवर कोणताही बोजा न पडता काढला गेला, मार्केटमधील धान्य व संपत्तीच्या संरक्षणाची बाब म्हणून सीसीटीव्हीचे नियोजन केले, समितीची भविष्यातील आर्थिक बचत म्हणून सोलर चे काम प्रोसेस मध्ये आहे. यासाठी ना.अनिल दादा पाटील यांच्या मदतीने डीपीडीसी मधून एक कोटी निधी उपलब्ध होणार आहे. मार्केट ला येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निवास आणि भोजनालयासाठी प्रस्ताव तयार असून 50 टक्के सबसिडीवर पणन मंडळाकडून सदर योजना मिळणार आहे.
याव्यतिरिक्त अमळनेर तालुक्यास ना.अनिल पाटील यांच्या रुपाने प्रथमच मंत्री पदाचा बहुमान मिळाल्याने पहिला नागरी सत्कार समारंभ मार्केट मध्ये घेण्यात आला, कापसासाठी महिलांचे प्रशिक्षण आणि सोसायटीचे चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचेदेखील प्रशिक्षण घेतले. गणेशोत्सवात केदारनाथची प्रतिकृती सादर करुन ग्रामीण व शहरी गणेशभक्तांना सोयी उपलब्ध करुन दिल्या. यासह अनेक उपक्रम कृषि उत्पन्न बाजार समितीने राबविल्याचे त्यांनी सांगितले.
भविष्यातही चांगल्या योजना
आमचे संचालक मंडळ एवढ्यावरच थांबले नसून ना. अनिल दादांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीत सृजनशीलता दाखविण्याचा संकल्प आहे. मुख्य रस्त्यालगत मार्केटच्या संकुलातील वरच्या बाजूला गाळ्यांचे काम अपूर्ण असल्याने तेथे टाकलेला पैसा वायफळ जावू नये म्हणून त्याठिकाणी मार्केटवर कोणताही बोजा न येता सारस योजनेतून गाळे घेणाऱ्यांनी स्वतः बांधून वापरायचे या तत्वावर १०० गाळे निर्माण करणार आहोत. यातून जमा होणाऱ्या अनामत रक्कमेतून कर्जफेडीसाठी रक्कम वापरायचे नियोजन आहे. त्यामुळे मार्केटवरील कर्जाचा बोजाही कमी होईल आणि भाडे सुरु झाल्यावर मार्केटचे उत्पन्न देखील वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त शेतकरी निवास व भोजनालय निर्मिती, हमाल व मापाडी भवनाचे पुनर्जीवन, शेतकरी सुविधा केंद्र यासह तत्कालीन सभापती तथा आताचे मंत्री अनिल दादा पाटील यांनी शेतकरी हितासाठी राबविलेला खुला कापूस खरेदी लिलाव पुन्हा सुरु करण्याचा मानस त्यांनी व्यक्त करत त्यासाठी जीनवाल्यांशी बोलणी सुरु आहे. प्रस्तावित कोल्ड स्टोरेज देखील उभारण्याचे प्रयत्न आमचे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
नोकरभरतीचा अपप्रचार
नोकरभरती बाबत बोलतांना सभापती पाटील म्हणाले की, याबाबत अपप्रचार होत असून कायम नोकरभरती करण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही, खरेतर आतापर्यंत येथे पुढाऱ्यांचीच मुले भरली गेली आहेत. आजही खेडा खरेदी,भरारी पथक यासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्याने काही कंत्राटी कर्मचारी घेण्याची संकल्पना आम्ही मांडली आहे,त्यातही वायरमन, वेल्डर, सॉफ्टवेअर संगणकतज्ञ आदिंना प्राधान्य देण्याचा मानस आहे मात्र अजून कोणतीही तशी परवानगी आम्ही घेतलेली नाही. असेही त्यांनी सांगितले.
बैठकीचे पावित्र्य राखावे
दि १८ ऑक्टोबर च्या संचालक मंडळाच्या बैठकीत काहींनी पावित्र्य न राखता द्वेष डोक्यात ठेऊन विनाकारण राढा घालायचा म्हणून घातला,सभापतीना अरेरावीचेही प्रकार घडले,यावेळी महिला संचालक उपस्थित असताना अश्लील शिवीगाळ देखील केली गेली, हे अशोभनीय असून अशा बैठकीत आम्ही कां म्हणून यावे अशी तक्रार महिला संचालकाने केली आहे. पूर्वीची अवाजवी खर्चाची प्रथा आम्ही मोडीत काढली आहे. चुकीचे काम व चुकीचे खर्च करणारच नाहीत अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. यापुढे कुणीही बैठकीत असे असभ्य प्रकार केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा ईशाराही अशोक पाटील यांनी दिला आहे.
गाळे लिलावाची अनियमिततेची चौकशी
मागील संचालक मंडळाने ४८ गाळ्यांचा खुला लिलाव केला. यासाठी प्रत्येकी आठ ते दहा लाख अनामतही घेतली. रक्कम घेतली गेली असतांना लिलाव रद्द केला आणि पैसेही परत केले; त्यानंतर तेच गोडावून फक्त एक लाख रुपये घेऊन दिले गेले असे होण्याचे कारण काय? मार्केटला मोठी अनामत मिळाली असतांना ती परत दिलीच कां?असे अनेक प्रश्न उद् भवत असून हा प्रकार अनियमित वाटत असल्याने याची सहकार क्षेत्रातील तज्ञ लोकांची समिती नेमून चौकशी केली जाईल व अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाईल असा ईशारा अशोक पाटील यांनी दिला. भ्रष्टाचार करणार नाही आणि कुणाचा सहनदेखील करणार नाही असा खुलासा देखील त्यांनी केला. यावेळी संचालक समाधान धनगर, प्रकाश अमृतकर, सौ.पुष्पा विजय पाटील, भाईदास सोनू भिल, शरद पाटील व सचिव डॉ. उन्मेषकुमार राठोड उपस्थित होते.