जळगाव मिरर | ५ जून २०२५
शहरातील शिवाजीनगर परिसरातील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी ब्राह्मण संघाच्या सभागृहाच्या समोर बोगदा प्रस्तावित आहे. याबाबत जळगाव महापालिका तसेच नागरिकांनी रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी पत्र दिले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या बोगद्याचे काम सुरू करण्याची विनंती मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समितीच्या बैठकीत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्याकडे सल्लागार समितीचे सदस्य विराज कावडिया यांनी केली.
मध्य रेल्वेतर्फे क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समितीची १२६वी बैठक गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे झाली. अध्यक्षस्थानी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा होते. यावेळी बैठकीत मध्य रेल्वेचे सल्लागार समितीचे सदस्य विराज कावडीया यांच्यासह मध्य रेल्वेतील ४७ सदस्य उपस्थित होते. बैठकीत मध्य रेल्वे क्षेत्रातील विविध प्रश्न यावेळी मांडण्यात आले. रेल्वे स्थानकातील काम पूर्ण होणार. जळगाव रेल्वे स्थानकामध्ये विविध विकास कामे सुरू असून नवीन इमारत, सरकते जीने, प्लॅटफॉर्म, वाहनतळ आदी कामांचे प्रश्न यावेळी मांडण्यात आले. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी २०२५ पर्यंत काम पूर्ण होणार असल्याचे आश्वासन सल्लागार समिती सदस्य यांना रेल्वे प्रशासन कडून देण्यात आले.
अमरावती-पुणे गाडी नियमित करण्याची मागणी
बैठकीत पुणे येथे जाण्यासाठी भुसावळ-जळगाववरून जाणाऱ्या रेल्वे गाड्या कमी असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी २२११८ अमरावती-पुणे ही साप्ताहिक गाडी नियमित करण्याची मागणी करण्यात आली. या विषयी रेल्वे बोर्डला विनंती केली असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले. अमरावती-मुंबईच्या रेल्वे गाडीचे कमी केलेले स्लीपर कोच वाढविण्यात यावे, ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात ५० टक्के सवलत पुन्हा सुरू करावी, या मागण्यांसह विविध मागण्या यावेळी बैठकीत केल्या गेल्या
जळगाव रेल्वेस्थानक येथील स्थिती, मध्य रेल्वे पोलिस आयुक्तांना सुरेंद्र नाथ चौधरी यांना दिले निवेदन. टवाळखोरांना आवरायचे कसे? स्टेशनवर एकच महिला पोलिस कर्मचारी जळगाव रेल्वे स्थानकावर दररोज हजारो प्रवासी रात्र-दिवस येत असतात. यात मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील समावेश आहे. मात्र, जळगाव रेल्वे स्टेशन येथे महिलांची सुरक्षा वाऱ्यावर दिसून येत असून रेल्वे पोलिस दलामध्ये केवळ एकच महिला पोलिस कर्मचारी असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. जळगाव रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वे लाइनवरील महत्त्वाचे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावरून मुंबई तसेच सुरत रेल्वे लाइन जात असून, या रेल्वे स्थानकावरून दिवसाला १०९ रेल्वे गाड्या जातात. त्यामुळे हजारो प्रवासी दररोज जळगाव रेल्वे स्थानकावर येतात. त्यात महिला प्रवाशांची संख्यादेखील मोठी असून रात्री असलेल्या रेल्वे गाड्यांनी जाण्यासाठी महिला प्रवाशांची गर्दी नेहमी असते.
अजून महिला कर्मचाऱ्यांची आवश्यकता- जळगाव रेल्वे स्थानक येथील रेल्वे पोलिस दलात पोलिस अधिकारी यांच्यासह आठ ते दहा पुरुष रेल्वे पोलिस कर्मचारी आहे. तर एकच महिला पोलिस कर्मचारी कार्यरत आहे. त्यामुळे दोन ते तीन अजून महिला पोलिस कर्मचाऱ्यांची जळगाव रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलिस दलाच्या स्टेशनमध्ये आवश्यकता आहे. त्यात जळगाव रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलिस दलात केवळ एकच महिला कर्मचारी असल्याने जळगाव रेल्वे स्थानकावरील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याबाबत मुंबई येथे मध्य रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत जळगाव येथील सल्लागार समितीचे सदस्य विराज कावडिया यांनी हा प्रश्न उपस्थित करून मध्य रेल्वे मुख्य सुरक्षा आयुक्त सुरेंद्रनाथ चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे जळगाव रेल्वे स्थानकामध्ये महिला रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी केली आहे.
रात्रीच्या वेळी टवाळखोरांचा धाक…
जळगाव रेल्वे स्थानक परिसरात तसेच प्लॅटफॉर्मवर रात्री-अपरात्री शिवाजीनगर, हुडको, गेंदालाल मिल परिसरातील टवाळखोर असतात. त्यात प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे.
राजधानी एक्सप्रेसला भुसावळ विभागात वातानुकूलित प्रथम श्रेणीत मिळणार कोटा.
१२१४२ पाटलिपुत्र एक्सप्रेसला मिळणार जळगावला थांबा.
खांडवा ते मुंबई पर्यंत नवीन रेल्वे गाडी प्रस्तावित. या विषयी रेल्वे बोर्ड ला मागणी करण्यात आली आहे.
जळगाव रेल्वे स्थानक येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर शिवाजीनगर कडे लवकरच होणार चारचाकी वाहनतळ व तिकीट आरक्षण केंद्र.
अनधिकृत तिकीट दलालांच्यावर होणार कारवाई. तत्काळ आरक्षणावेळी होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी CCTV लावण्यात येणार आहे व नागरिकांना या त्रासापासून सुटका देण्यासाठी रेल्वे पोलीस किशोर कारवाई करणार आहेत.
जळगाव रेल्वे स्थानक परिसरात महिला रेल्वे पोलिस कर्मचारी फक्त एकच असून रात्री-अपरात्री महिला प्रवासी या रेल्वे स्थानकावर असतात. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलिस कर्मचारी वाढविण्याची गरज आहे.
– विराज कावडिया, मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य




















