जळगाव मिरर / ८ फेब्रुवारी २०२३ ।
राज्यातील यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केला आहे. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या रेवदंडा इथल्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
१४ मे १९४६ रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेल्या ३० वर्षापासून निरुपण करत आहेत. तसेच अंधश्रध्दा, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या असून, आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही ते करत आहेत. रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन, भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे.
पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलेलं वृक्षारोपण आणि त्यांचं संवर्धन याची दखल संपूर्ण जगानं घेतली आहे. शिवाय रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, स्मशान आणि कब्रस्थानांची स्वच्छता, विहीरींमधील गाळ काढून स्वच्छ करणं यासह अनेक कामं या माध्यमातून केली जातात. विशेष म्हणजे, यापूर्वी ज्येष्ठ निरुपणकार दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी यांनाही यापूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.