जळगाव मिरर | २२ मे २०२५
राज्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. या बाई छगन भुजबळांच्या शपथविधीवेळी त्यांच्या स्वागतासाठी सर्वात पुढे होत्या. त्यावेळी त्या वैष्णवी प्रकरणावर काहीही बोलल्या नाही. पण आता त्यांचे वरातीमागून घोडे सुरू आहेत, असे त्या म्हणाल्यात.
रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी पोलिसांना वैष्णवी हगवणे प्रकरणाची तत्काल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. त्यावर रोहिणी खडसे यांनी महिला आयोगाचा कारभार म्हणजे वराती मागून घोडे असा पलटवार केला आहे. सत्तेतील सर्वच लोक आपला म्हणून हगवणेला वाचवत आहेत. त्यामुळे आरोपी अजूनही सापडत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला आहे.
रोहिणी खडसे आपल्या पोस्टमध्ये यासंबंधी म्हणाल्या, आपल्या राज्य महिला आयोगाचाा कारभार म्हणजे वराती मागून घोडे असा आहे. बरं बाईंचा अविर्भाव पण असा की, जणू काही कोणत्या तरी चांगल्या कामासाठी देशाला संबोधित करत आहेत. कालपरवा छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेली बाई सर्वात आधी स्वागतासाठी उभ्या होत्या. समोर मीडिया होती. पण त्यावेळी बाईंनी वैष्णवीच्या केसवर बोलणे टाळले. त्यामुळे या प्रतिक्रियेवर आम्हाला वाटते की, दाल में कुछ काला है. ही जबरदस्तीने द्यायला सांगितलेली प्रतिक्रिया आहे का? असा प्रश्न आमच्या मनात आहे.
वैष्णवीची केस ही पुण्याची आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत. हगवणे हा दादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे. पण अजितदादानी अद्यापही या प्रकरणात शब्द उच्चारला नाही. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत. त्यांनीही हगवणेच्या हकालपट्टीची नोटीस काढायला हवी होती. पण अजूनही त्यांची हकालपट्टी केली गेली नाही. एरवी सर्व गोष्टींमध्ये बोलणाऱ्या चित्रा वाघही या प्रकरणात गप्प आहेत. याचा अर्थ असा की, सत्तेतील सर्वच लोक आपला म्हणून हगवणेला वाचवत आहेत. त्यामुळे अजूनही आरोपी सापडत नाही. त्यांची हकालपट्टी होत नाही. उलट त्यांची पाठराखण केली जात आहे, असे रोहिणी खडसे यांनी या प्रकरणी म्हटले आहे.





















