जळगाव मिरर / २६ मार्च २०२३ ।
राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री असलेले अब्दुल सत्तार हे आपल्या वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांच्या या विधानाचीही मोठी चर्चा होत आहे.
राज्याचे कृषी मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे काल हिंगोली जिल्हाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतींची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी हिंगोली येथील रामलीला मैदानावर आयोजित कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या मेळाव्यात त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.
अब्दुल सत्तार म्हणाले, मी तुमच्या सारखाच एक सामान्य कुटुंबातून आलो आहे. बस माझी बॅटरी चार्ज केली आणि मी इथपर्यंत आलो. भाऊ आले (हेमंत पाटील) इतक्या वर्षापासून आपण सत्तेत आहोत. शेवटी नावात सत्तार आहे. त्यामुळे कोणाचीही सत्ता आली की आपण पक्के असे सत्तार म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.