जळगाव मिरर | ९ ऑक्टोबर २०२३
देशातील अनेक मोठ्या शहरात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत असतांना दक्षिण पश्चिम दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी दक्षिण पश्चिम दिल्लीतील मुनिरकामध्ये एका घरात महिला आणि तिच्या २ मुलांचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ माजली होती. मृत महिलेच्या मनगटावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या खूणा आढळल्या. मृत महिलेचे नाव वर्षा शर्मा असून तिच्या २ लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुनिरक परिसरातील एका फ्लॅटमध्ये २७ वर्षीय विवाहिता वर्षा शर्मा आणि तिच्या अडीच वर्ष आणि ४ वर्षाच्या २ मुलांचा मृतदेह सापडला. वर्षाचा पती जोगेंद्र शर्मा हा नार्कोटिक्स डिपार्टंमेंटमध्ये कॉन्स्टेबल आहे. ही घटना ८ ऑक्टोबरची असून सकाळी १०.३० वाजता हा प्रकार समोर आला. मुनिरका भागातून पोलिसांना एक कॉल आला त्यात महिलेने घरात आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर तातडीने पोलिसांची टीम घटनास्थळी पोहचली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा आतमध्ये तिघांचे मृतदेह सापडले. त्यांच्या मनगटावर कापल्याच्या खूणा होत्या. प्राथमिकदृष्ट्या महिलेने आधी २ मुलांचा खून करून स्वत: आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे. परंतु यामागचं कारण काय? हे कुणालाही माहिती नव्हते. परंतु संध्याकाळी जेव्हा मृत महिलेच्या वडिलांनी ४ पानी तक्रार पोलिसांना सोपावली तेव्हा या घटनेमागचे रहस्य उलगडले. तक्रारीत मृत महिलेच्या वडिलांनी जावई जोगेंद्र आणि मुलगी वर्षाच्या नात्यावर भाष्य केले.
जावई जोगेंद्र हा तंत्रमंत्र, पूजापाठ, नशा करणे, मारहाण करून हुंड्यासाठी संपूर्ण कुटुंबाला त्रास देत होता असा गंभीर आरोप वडिलांनी केला. अद्याप मृत महिलेच्या वडिलांचा जबाब नोंदवणे बाकी आहे. जबाबानंतर पोलीस या घटनेत गुन्हा नोंद करणार आहेत. दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून क्राईम इन्वेस्टिगेशन टीम आणि एफएसएल टीम एकत्रितपणे फ्लॅटची तपासणी करणार आहे. वर्षाने आधी २ मुलांना मारले त्यानंतर आत्महत्या केली असावी असं प्रत्येकाला वाटतंय. तरीही पोलीस सर्व अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत.