
जळगाव मिरर | २४ जून २०२३
जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे भरधाव अनोळखी अनोळखी वाहनाच्या धडकेत दुचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दुचाकीने जात असलेले पती-पत्नी ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात आई वडिलासोबत असलेल्या लहान मुलाला मात्र किरकोळ मार लागला आहे. या घटनेची नशिराबाद पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
मिळालेल्या माहितीनुसार. जामनेर तालुक्यातील सामरोद येथील ३५ वर्षीय शेनफडू बाबुराव कोळी हे त्यांची पत्नी भारती कोळी (वय ३२) व मुलगा रुद्र (वय ३) यांच्यासह सामरोद येथे कुटुंबासह शेती काम करून राहतात. ते शनिवारी २४ जून रोजी सकाळी आसोदा येथे त्यांच्या नातेवाईकाकडे भेटीसाठी आले होते. तेथून सकाळी ९ वाजेच्या सुमारास ते परत निघाले. त्यांचा दाजी शंकर कोळी याने, त्यांना नशिराबाद, कुन्हा मार्गे सामरोदला जाता येईल असे सांगितले. त्यानुसार ते नशिराबाद मार्गे दुचाकी (क्र. एमएच १९.ए.ए.२०९५) ने निघाले. काही वेळांनंतर नशिराबाद येथे महाजन हॉटेलजवळ आयशर वाहनाने धडक दिल्यामुळे ते जागीच कोसळले. त्यात भारती कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. तर शेनफडू कोळी व त्यांचा मुलगा रुद्र याला नशिराबाद पोलीस व नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे उपचारादरम्यान शेनफडू याचा मृत्यू झाला आहे. तर रुद्र हा घटनास्थळी रडत होता. त्याला किरकोळ मार लागला असून तो सुखरूप आहे.





















