जळगाव मिरर / १२ एप्रिल २०२३ ।
जगभरात भारतीय रेल्वेचे नेहमीच कौतुक होत असतांना दिसत असते. आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे ही सर्वात सुविधाजनक पर्याय मानली जाते. यामुळे तुमच्या पैशांची आणि वेळेची देखील बचत होते.
आज भारतातील रेल्वेचे जाळे इतके मोठे झाले आहे की, ते जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क आहे. अनेकदा लोक हे विना तिकीट प्रवास करतात. अशांना टीटी पकडतो आणि त्यांना दंड आकारला जातो. मात्र आज आम्ही तुम्हाला त्या ट्रेनबद्दल सांगणार आहोत, त्यात प्रवास करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तिकिटाची गरज नसते. ही ट्रेन सर्व प्रवाशांसाठी पूर्णपणे फ्री आहे. आम्ही परदेशातील एखाद्या ट्रेनविषयी बोलत नाहीये. तर आम्ही भारतातील ट्रेनविषयी बोलत आहोत. तुम्हालाही जाणून आश्चर्य वाटलं ना? चला तर मग जाणून घेऊया हे नेमकं प्रकरण काय?
ही ट्रेन कोणती?
भारताची ही मोफत ट्रेन आजपासून नाही तर तब्बल 75 वर्षांपासून लोकांना फ्रीमध्ये प्रवास करण्याची संधी देतेय. ही ट्रेन पंजाब आणि हिमाचलच्या सीमेजवळ चालते. या ट्रेनचं नाव भाक्रा-नांगल ट्रेन आहे. ही ट्रेन भाक्रा ते नांगल दरम्यान धावते. ज्यावेळी जगभरातून पर्यटक भाक्रा-नांगल धरण पाहण्यासाठी येतात. त्या वेळी या ट्रेनने प्रवास करतात. या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी पर्यटकांकडून एक रुपयाही घेतला जात नाही. एवढंच नाही तर तिकीटही आकारले जात नाही.
ट्रेनचा इतिहास काय?
ही ट्रेन 1948 मध्ये सुरू झाली होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या ट्रेनचे डबे लाकडापासून बनवलेले आहेत. जेव्हा ही ट्रेन सुरू झाली तेव्हा तिला 10 डबे होते पण आता फक्त 3 डबे आहेत. या ट्रेनमधून रोज सुमारे 800 लोक प्रवास करतात.
ही ट्रेन देशाचा वारसा आणि परंपरा आहे देशाचा वारसा आणि परंपरा म्हणून या ट्रेनकडे पाहिलं जातं. सन 2011 मध्ये आर्थिक नुकसान लक्षात घेऊन त्याची मोफत सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण नंतर तो निर्णय मागे घेण्यात आला आणि ही ट्रेन लोकांसाठी मोफत ठेवण्यात आली.