
जळगाव मिरर | २९ जून २०२३
राज्यात गेल्या काही दिवसापासून परिवारात होणारे वाद सातत्याने वाढत असतांना त्यातून मोठ मोठ्या घटना घडत आहे. त्यातील एक घटना समोर आली आहे. ज्याने महाराष्ट्र हादरला आहे. आजही अनेक भागांमध्ये मूल होत नाही म्हणून सूनेचा छळ केला जातो. या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाही. मूल होत नाही या रागातून चक्क पत्नीलाच जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ही धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील तळणी- मंठा भागात घडली आहे.
24 जून रोजी कारमध्ये आग लागून पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. मात्र आता या घटनेत मोठा ट्विस्ट आला आहे. या कारला आग लागली नव्हती तर लावण्यात आली होती. मूल होत नसल्याचा राग डोक्यात असल्याने पतीनंच हे भयंकर कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.सविता अमोल सोळंखे असं मयत झालेल्या महिलेचं नाव असून दोघांचं लग्न होऊन तेरा वर्ष झाली होती. मात्र त्यांना मुलबाळ होत नव्हतं. अमोल त्या कारणावरून सविताला मारहाण करून शारिरीक आणि मानसिक त्रास द्यायचा. वारंवार अमोल सविला घटस्फोट दे अशी मागणी करत होता. मात्र त्याला सविता नकार देत होती.
याचाच राग मनात धरून पती अमोलनं पत्नीला कारमध्ये जिवंत जाळलं आणि अपघाताचा बनाव करून कारला आग लागल्यानं पत्नीचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली. दरम्यान पोलिसांनी पाच दिवसांत या प्रकरणाचा उलगडा केला आहे.






















