जळगाव मिरर | २१ फेब्रुवारी २०२४
तीन वर्षीय चिमुकली घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत खेळत असतांना नकळत विजेच्या खांबाला हात लावला. इलेक्ट्रिक पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्यामुळे तिला शॉक लागला. कुटुंबियांनी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच वाटेतच चिमुकलीचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात मंगळवारी २० फेब्रुवारी पहाटेच्या सुमारास घडली. फरीया अलीम शेख (वय ३) असं मृत चिमुकलीचं नाव आहे. फरीयाच्या मृत्युने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे फरीयाचा जीव गेल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करा, अशी मागणी देखील शेख कुटुंबियांनी केली आहे. हि घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिंतूर शहरातील आठवडी बाजार परिसरातील अलीम शेख आपल्या कुटुंबासहित राहतात. मोलमजुरी करत ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मंगळवारी नेहमीप्रमाणे अलीम हे सकाळी उठून कामावर गेले. यावेळी फरीया आणि तिची आई दोघेच घरात होते. आई घरकामात व्यस्त असताना फरीया झोपेतून उठून घराबाहेर असलेल्या मोकळ्या जागेत खेळायला गेली. खेळता खेळता तिने नकळत विद्युत खांबास स्पर्श केला. जबर शॉक लागल्याने फरीया जागेवर बेशुद्ध पडली.
परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केली असता फरीयाच्या आईने घराबाहेर धाव घेतली. दरम्यान, बेशुद्ध अवस्थेत चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं. या घटनेनंतर शासकीय रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.