
जळगाव मिरर | २३ जून २०२६

ठाकरे गटातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर खासदार संजय दिना पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विरोधकांना थेट इशारा देतानाच ठाकरे गटातील एका वरिष्ठ नेत्यावरही गंभीर आरोप केले आहेत.
संजय दिना पाटील म्हणाले की, “माझे ठाकरे गटाच्या सामान्य कार्यकर्त्यांशी कोणतेही वैर नाही. त्या कार्यकर्त्यांमुळेच मी खासदार झालो. मात्र, कोणी माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबाकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर त्यांनी आधी मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स काढून ठेवावे. कारण माझ्या नादाला लागणारे थेट हॉस्पिटल किंवा स्मशानात जातील.”
ठाकरे गटाकडून आंदोलन किंवा हल्ल्याच्या शक्यतेबाबत विचारले असता त्यांनी आणखी आक्रमक भूमिका घेतली. “मला पोलिस सुरक्षा नको आहे. पोलिस सोबत असतील तर ते मला अडवतील. कोणी हल्ला करायला आले तर मी त्यांना उत्तर देईन. आम्ही कोणाच्या जीवावर राजकारण करणारे नाही, तर स्वतःच्या हिमतीवर लढणारे आहोत,” असे ते म्हणाले.
पक्षांतराचे कारण स्पष्ट करताना संजय दिना पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल कोणतीही नाराजी नसल्याचे सांगितले. “महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी तिकीट वाटपाच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी माझ्यासमोर अडचण व्यक्त केली होती. त्यावेळी मी स्वतः माघार घेतली होती. मात्र, ठाकरे गटातील एका वरिष्ठ नेत्याने माझ्या कार्यकर्त्यांना आणि मला सतत दुय्यम वागणूक दिली,” असा आरोप त्यांनी केला. त्यांनी पुढे दावा केला की, त्यांच्या ४० शाखाप्रमुखांपैकी एकालाही पक्षात योग्य स्थान किंवा उमेदवारी देण्यात आली नाही. “एका नेत्याच्या अहंकारी वागणुकीमुळेच मला पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला,” असेही त्यांनी म्हटले.
संजय दिना पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः हिंसक स्वरूपाच्या इशाऱ्यांमुळे त्यांच्या वक्तव्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.





















