जळगाव मिरर | ४ मे २०२४
मुंबईला वेढणाऱ्या समुद्रात आगामी 36 तासांच्या कालावधीत भरतीच्या वेळी अंदाजे 5 मीटर पेक्षाही जास्त उंचीच्या मोठ्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मच्छीमार, कोळी यांनी समुद्रात बोटीने जाणे अथवा समुद्र किनारी पर्यटकांनी, नागरिकांनी कोणीही जावू नये, असा इशारा मुंबई महापालिकेने भारतीय हवामानशास्र विभाग आणि ‘इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हीस’ यांच्या हवाल्याने मुंबईकरांना दिला आहे. यानंतर मुंबई महापालिका सतर्क झाली असून आपत्कालिन यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
मुंबई महापालिका आपत्कालिन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय हवामानशास्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हीस यांनी शनिवारी सकाळी 11.30 वाजेपासून ते रविवार 5 मे रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंत 36 तासांच्या कालावधीत समुद्रात भरतीच्या वेळी अंदाजे 5 मीटर पेक्षाही अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे अग्निशमन दल, नौदल, पोलिस यांनाही अलर्ट करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
रविवार 5 मे रोजी मध्यरात्री 3.30 वाजता ओहोटी असल्याने समुद्रात 1.05 मीटर उंचीच्या लाटा असतील. मात्र सकाळी 9.50 वाजता समुद्रात 4.04 मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. परिणामी या लाटांची उंची 1.5 मिटरने वाढल्यास समुद्रात प्रत्यक्षात 5.54 मिटर उंचीच्या लाटा उसळतील. त्याचप्रमाणे दुपारी 3.35 वाजता समुद्रात ओहोटी असल्याने समुद्रातील लाटांची उंची 1.32 मिटर इतकी असणार आहे. मात्र रात्री 9.56 वाजता समुद्रात 4.27 मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. परिणामी त्या लाटांची उंची 1.5 मीटरने वाढून प्रत्यक्षात 5.74 मिटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळणार आहेत. परिणामी, येत्या 36 तासांत नागरिकांनी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
