मुंबई : वृत्तसंस्था
या नव्या सरकारच्या स्थापनेनंतर आता महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा शेवट झाल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी सायंकाळी राजभवनात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र शिदे आणि फडणवीस सरकार स्थापन होऊन अद्याप २४ तासही उलटत नाहीत, तोच हे सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले की, प्रासंगिक करार आहे यांची माहिती भाजपलाही आहे. हे सरकार किती दिवस टिकणार आणि २०२४ साली ते पुन्हा निवडून येतील किंवा नाही, याबाबत शंका आहे. २०२४ पूर्वीच निवडणुका होतील असे मला वाटत आहे. त्यावेळी हे सगळे निवडून येतील किंवा नाही, याची चांगली माहिती राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना देखील आहे. त्यामुळे यांच्यावर किती अवलंबून राहायचे हे, भाजप ठरवेल, असेही पाटील म्हणाले.
पक्षाध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस आल्याची माहिती आम्हाला त्यांच्या गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेनंतरच कळली. मागील चार निवडणुकांमध्ये पवारांनी भरलेल्या प्रतिज्ञापत्राची माहिती आयकर विभागाने मागवली आहे. त्यांना नोटीस पाठविण्याऐवजी आयकर विभागाने जर निवडणूक आयोगाकडून ही माहिती मागवून घेतली असती तर त्यांना तिथून माहिती मिळाले असतीच. पण जाणीवपूर्वक यंत्रणांचा गैरवापर करुन प्रभाव निर्माण करण्याचा काही लोकांचा प्रयत्न सुरु असल्याची टीका पाटील यांनी केली.
महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष एकत्र होतो. यापुढेही विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आमचा एकच उमेदवार असणार आहे. सरकार गेल्यानंतर आम्ही एकत्र बसून चर्चा केलेली नाही. पुढील काळात एकत्र बसून पुढील धोरण ठरवू. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत जिथे जिथे शक्य होईल, तिथे तीनही पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करु, असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले. तसेच संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीची नोटीस आली असून ते चौकशीला सामोरे गेलेले आहेत. ते निर्दोष असून त्याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही. आजच्या चौकशीनंतर ईडीचे दिल्लीतले अधिकारी काय निर्णय देतात हे पाहावे लागेल. संजय राऊत यांच्याविरोधात ईडी जाणीवपूर्वक टोकाची भूमिका घेणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.





















