जळगाव मिरर | १२ मे २०२५
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांचे डोळे दहावीच्या निकालाकडे लागलेले आहेत. दहावीचा निकाल याच आठवड्यात जाहीर होणार असून, 13 ते 15 मेदरम्यान निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्यांनी दिली आहे.
राज्य मंडळाने यंदा पहिल्यांदाच सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल जाहीर होण्याअगोदरच बारावीचा निकाल जाहीर करण्याची किमया साधली आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी बारावीच्या निकालाच्या पत्रकार परिषदेतच दहावीचा निकाल यंदा 15 मेपूर्वीच जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सोमवारी बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे निकाल जाहीर करण्यासाठी राज्य मंडळाकडे आता अवघे तीन दिवस उरल्याचे स्पष्ट झाले आहे. दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
राज्य मंडळातील अधिकार्यांनी निकालाच्या सद्य:स्थितीबद्दल माहिती देताना सांगितले की, दहावीच्या निकालाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. निकालाच्या कामकाजाचा आढावा सोमवारी किंवा मंगळवारी घेण्यात येणार असून, निकाल कधी जाहीर करायचा, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमातून दहावीच्या निकालाच्या विविध तारखा जाहीर करण्यात येत आहेत. परंतु, राज्य मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर करण्याचे प्रकटन देण्यात येते. त्यातील माहितीवरच विश्वास ठेवावा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट केले आहे. तसेच, निकाल 15 मेपूर्वीच जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
