
ठाणे : वृत्तसंस्था
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे कोश्यारी यांना त्यांच्या पदावरुन हटवण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. तसेच कोश्यारी यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. राज्यभर टीका झाल्यानंतर कोश्यारी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. असे असले तरी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनिदेखील या प्रकरणावर बोलताना वेळ आली तर राज्यपालांना हाकलून देण्यासाठी राजभवनात घुसावे लागेल, असा थेट इशारा दिला आहे. राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर आव्हाड यांनी पत्नकार परिषदेत हा इशारा दिला.
भगतसिंह कोश्यारी माफी मागा. महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल बोलायची तुमची लायकी नाही. तुम्ही कोठून आले, कुठल्या राज्याचे मुख्यमंत्री होते, याबद्दल आम्हाला काहीही देणघेणं नाही. आमच्या मराठी मातीत राहणार असाल तर परत मराठी माणूस आणि महाराष्ट्राबद्दल बोलल्यास याद राखा. सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन राजभवनात घुसून राज्यपालांना हाकलून देण्याची वेळ आता आली आहे. सोमवारी त्यांच्या विरोधात जोडेमार आंदोलन करण्यात येणार असून तेच जोडे त्यांना पाठविले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यापूर्वीही राज्यपाल कोश्यारी यांनी राज्याचा वारंवार अपमान केला आहे. जेव्हा राज्यपालांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा अपमान केला तेव्हाच त्यांना त्यांची जागा दाखवायला हवी होती. राज्यपालांना महामहीम म्हणून बोलले जाते. राज्यपालांना नेहमी अहो जाहो म्हंटले जाते. महामहिम राज्यपाल असे संबोधले जाते. मात्र, आता त्यांची तशी लायकी उरलेली नाही. त्याला मराठी माणसांची किंमत समजली नाही. महाराष्ट्राचे थोर कवी, दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे म्हणतात, ‘ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नाही तर, कष्टकऱ्यांच्या तळहातावर उभी आहे’, यातच मराठी माणसाची ओळख आहे. त्यांनी मराठी माणसाचा नाही तर त्यांच्या अस्मितेचा अपमान केला आहे. मराठी माणसाच्या अस्मितेचा अपमान कधीही सहन करणार नाही. मुंबई ही सहजा सहजी मिळाली नसून त्याकरिता रक्ताचे पाट वाहिले आहेत.
मुंबई हे देशाचे व्यवसायिक रूप असलेले शहर आहे. यश हा मुंबईच्या मातीचा गुण असून राज्यपालांनी जे वक्तव्य केले आहे. त्याने सह्याद्रीचा मराठी मातीचा अपमान झाला आहे. मराठी माणसाने जेव्हा मुंबई हातात घेतली, तेव्हा १०५ लोक न घाबरता बंदुकीच्या गोळ्यांना सामोरे गेले होते. आम्ही मुंबई घेतली आहे. तेव्हा आता आम्ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारीयांना परत बोलवा, असे म्हणणार नाही तर आता त्यांना पळवून लावू, गरज पडली तर राजभवनात घुसू, असा इशारा आव्हाड यांनी दिला.





















