
मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात पीएमएलए कोर्टाने दिलेल्या निर्णयात ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत अजून मोठी वाढ झाली आहे.
संजय राऊंताची ८ दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी ईडीने केली होती. मात्र न्यायालयाने केवळ चार दिवसांची कोठडी मंजूर केली. तसेच राऊत यांना त्यांच्या वकिलांशी बोलण्याची सुविधा दिली जाईल, असे न्यायालयाने निकाल देताना सांगितले. ईडीला संजय राऊत यांच्या औषधे इत्यादींची काळजी घ्यावी लागेल आणि चौकशीचे तासही निश्चित करावे लागतील, असे न्यायालयाने म्हटले आहे. आज संजय राऊत यांच्या वतीने अशोक मुंदरगी आणि ईडीच्या वतीने हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
सुनावणीदरम्यान संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरगी यांनी न्यायालयात सांगितले की, संजय राऊत यांची अटक हा राजकीय कटाचा भाग आहे. राऊत यांना हृदयाशी संबंधित समस्या असून, त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. न्यायालयात संबंधित कागदपत्रेही दाखविण्यात आली होती.
संजय राऊत यांना अनेकदा समन्स बजावले होते. मात्र समन्स बजावून सुद्धा हजर न राहिल्याने रविवारी ईडीने थेट संजय राऊत यांच्या भांडूप येथील घरी धाड टाकली होती. या कारवाईत ईडीने तब्बल 9 तास संजय राऊत यांची चौकशी केली. या चौकशीनंतर संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात अटक केली होती. तसेच ईडीने राऊत यांच्या च्या घरातून 11.5 लाख रुपये जप्त केले होते.




















