जळगाव मिरर | २६ जानेवारी २०२४
राज्यातील मराठा सामाजासाठी आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येऊन धडकले असून नवी मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केटमध्ये शुक्रवारी २६ जानेवारी पहाटे मराठा समाजाची पदयात्रा पोहचली आहे. दरम्यान, नवी मुंबईत दाखल होताच मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे.
पदयात्रेमुळे मनोज जरांगे यांच्या पायाला सूज आली असून सकाळपासूनच त्यांना ताप भरला आहे. त्यामुळे जरांगे यांची माथाडी भवन येथे होणारी जाहीर सभा रद्द करण्यात आली आहे. सध्या जरांगे हे हे एपीएमसी मार्केटमधील प्रशासकीय इमारतीमध्ये आराम करीत आहेत.
सकाळी ९ वाजेनंतर ते वाशी येथील शिवाजी चौकात येणार असून तिथे जाहीर सभा घेणार आहेत. या सभेनंतर ते आझाद मैदानाच्या दिशेने कूच करणार आहे. यादरम्यान राज्य सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा जरांगे यांच्या भेटीसाठी येणार आहे.
गुरुवारी देखील सरकारच्या शिष्टमंडळाने लोणावळा येथे जरांगे यांची भेट घेतली होती. मात्र, या भेटीत मराठा आंदोलनावर कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे मुंबईत येऊन मराठा आरक्षण घेणारच असं जरांगे यांनी ठामपणे सांगितलं आहे. सध्या जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील मराठा बांधव नवी मुंबईत दाखल होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी देखील होत आहे.
हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या मराठा आंदोलकांमुळे रस्ते जाम झालेत. ही बाब सरकारसाठी मोटी डोकेदुखी ठरत आहे. दुसरीकडे आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची क्षमता कमी असल्याचं नवी मुंबई पोलिसांनी म्हटलंय. मराठा आंदोलकांनी नवी मुंबईतील खारघर येथे थांबावं अशी विनंती पोलिसांनी केली आहे.