जळगाव मिरर | ११ डिसेंबर २०२३
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या दौरा सुरु असून या दौऱ्या लाखो समाज बांधव त्यांचे अनेक शहरात जंगी स्वागत करीत आहे. नुकतेच लातुर जिल्ह्यात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी मनोज जरांगे पाटलांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पाटलांनी या सभेत थेट गृहमंत्री फडणवीस यांना थेट इशारा देखील दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले कि, समाजात जातीय तेढ निर्माण होत आहे त्यांनी शांत राहावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आरक्षणाचा विषय मार्गी लावू शकतात. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याबरोबरचे लोक आवरावे आणि दिलेला शब्द पाळावा, अन्यथा परिणाम भोगण्यासाठी तयार राहावे, असा इशारा थेट दिला आहे.
मनोज जरांगे म्हणाले, जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी सजग राहावं असं सातत्याने सांगत आहे मात्र छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर टीका करत आहेत. जातीय तेढ निर्माण करून काही मिळणार नाही. त्यांना ही माझी ही शेवटची विनंती आहे, जिभेला आवरा, गोरगरीब लोकांचे चांगले संबंध आहेत ते खराब करू नका. राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करू नका.
मंगलप्रसाद लोढांविषयी बोलताना जरांगे म्हणाले, मंगलप्रभात लोढा कोण आहेत?. मराठ्यांवर बोलण्याची यांना काय गरज पडली . हे फडणवीसांच्या जवळचे आहेत. फडणवीस यांना लक्षात आले पाहिजे. राज्यात शांतता राहिली पाहिजे, आपण सरकार चालवतो. राज्याचे पालकत्व आपल्याकडे आहे त्यांच्या लोकांनी असे स्टेटमेंट केलं नाही पाहिजे. फडणवीसांनी जे शब्द दिले त्याचा आम्ही सन्मान केला. आरक्षण देतो, गुन्हे मागे घेतो, अटक करणार नाही म्हणाले,अटक केली, गुन्हे दाखल केले नेमकं तुमच्या मनात डाव काय आहे हे एकदा स्पष्ट करा. तुमचे हे लोक थांबवा, थांबवायचे नसतील तर आम्ही ओळखून घेतले आहे फडणवीस साहेब काय करायचे आहे. ही धमकी नाही . मराठा समाजाने तुम्हाला 106 आमदार दिले आहेत. त्याची परतफेड मराठ्यांवर डाव टाकून करू नका. तुमचे पाच सात लोक आहेत ते कायम मराठ्यांवर गरळ ओकत आहेत. ही गोष्ट गंभीरपणे घ्या नाही तर 24 डिसेंबरनंतर परिणाम दिसतील. तुम्ही या लोकांना आवरा, ठरल्याप्रमाणे सगळे करा. तुम्ही डाव टाकला आहे गोड बोलायचे काम करायचे नाही. मराठा जागृत झाला आहे पहिल्या सारखा तो राहिला नाही याचे भान ठेवून काम करावे. भुजबळांचे ऐकून तुम्ही मराठ्यांच्या मुलांवर अन्याय करणार असाल तर याचे परिणाम भोगावे लागणार आहेत.