जळगाव मिरर । २९ जानेवारी २०२३ ।
राज्यातील हवामान गेल्या काही दिवसापासून हिवाळ्याची थंडी आहे तर सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, शनिवारी राज्याच्या किमान तापमानातही घट झाली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात शनिवारी राज्यात नीचांकी तापमानाची नोंद झाली असून, तापमानाचा पारा 11.3 अंशांवर घसरला आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. वातावरणातील या बदलाचा रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता पुन्हा वाढली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची, तसेच विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुणे, नगर, जालना, बीड जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान 11 ते 20 अंशांच्या दरम्यान आहे. ढगाळ वातावरणामुळे दुपारच्या वेळी राज्यात उकाडा जाणवत आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी 34.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. दरम्यान, खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. आता अवकाळी पावसामुळेही रब्बी पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. गहू, हरभरा, मोहरीनंतर आता कांदा पिकाला देखील वाढती थंडी आणि पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जास्त थंडीमुळं बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, धुळे यासह अनेक जिल्ह्यांतील शेतकरी चिंतेत आहेत. पावसामुळे पिके आडवे होण्याची तर ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने बळीराजा पुन्हा धास्तावला आहे.