जळगाव मिरर | २० ऑक्टोबर २०२३
जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा झाल्यानंतर त्यांनी आता आपला मोर्चा पुणे जिल्ह्याकडे वळविला आहे. ते आज शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करीत थेट राज्य सरकारला त्यांनी धारेवर धरत त्यांनी २४ तारीख अखेरची असेल असा दमच सरकारला दिला आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा विषय आता गांभीर्याने घ्यावा. येत्या २४ तारखेच्या आत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं. चालढकल करण्याचा प्रयत्न केला, तर मराठ्यांचं शांततेत सुरू असलेलं आंदोलन तुम्हाला पेलणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी जालन्यातील अंतरवली सराटी गावात उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील आता राज्यभरात सभा घेत आहेत. या सभेतून ते राज्य सरकारकडे वारंवार आरक्षणाची मागणी करीत आहेत. आज जरांगे पाटील यांची पुणे जिल्ह्यातील खेड आणि बारामती तालुक्यात जंगी सभा होणार आहे.