जळगाव मिरर | १६ जानेवारी २०२४
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून मनोज जरांगे पाटील सरकार विरोधात लढाई लढत आहे तर गेल्या काही दिवसापासून त्यांनी सभाच देखील तडाखा सुरु ठेवला आहे येत्या काही दिवसात मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करण्याची तारीख जाहीर करणार असून त्या आंदोलनाची धडकी सरकारला भरली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले कि, आपल्याला गोळ्या घातल्या, तरी आता मागे हटणार नाही. माझ्यावर ट्रॅप लावण्याचा प्रयत्न केला जातोय. आमच्याकडे दुर्लक्ष करून आमच्या आंदोलनाचा काही मंत्र्यांना अपमान करायचा आहे, असा आरोप मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी मंगळवारी केला. या मंत्र्यांची नावे उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कालच बोलणे झाले आहे. किती जणांना प्रमाणपत्र दिले आणि त्यांच्या परिवारातील किती लोकांना आपण प्रमाणपत्र दिले याबद्दल माहिती देण्यात यावी, अशी मागणी मनोज जरांगे यांनी प्रशासनाकडे केली.
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, 54 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, पण प्रशासनाने किती जणांना कुणबी दाखला दिला. त्यांच्या सोयऱ्यांना दाखला दिला?, असा सवाल करतानाच शासकीय अधिकाऱ्यांनी किती अडवणूक केली म्हणत त्यांनी हल्लाबोल केला आहे. तर आधीच हे सर्व दाखले दिले असते तर मराठा समाजावर मुंबईला जाण्याची वेळ आलीच नसती, आता आम्ही मुंबईला जाण्याची तयारी केली आहे, असा इशारा त्यांनी दिला.
मनोज जरांगे म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना आरक्षण देण्याची आमची मागणी आहे. आम्हाला माहिती आहे की, सरकार आमच्यावर डाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मला खात्रीलायक माहिती मिळाली आहे. माझ्यावर ट्रॅप लावण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या रॅलीत कुठेतरी त्यांचे लोक घुसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे आम्हाला त्यांचेच लोक, अधिकारी सांगत असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला.
मनोज जरांगे म्हणाले की, छगन भुजबळ म्हणाले की 200 बंदूक विकत घेतल्या आहेत. आमचे मनगट चांगले आहे. हिंसाचार करण्याचा प्रयत्न करतील त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करायचे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काही मंत्र्यांचा विरोध आहे, त्यांना आम्हाला मुंबईत येऊ द्यायचे नाही आणि आलो तरी आमच्याकडे दुर्लक्ष करत आमचा अपमान करायचा, असा काही मंत्र्यांचा प्लॅन आहे, त्यांची नावे उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.