
जळगाव मिरर | १२ जून २०२४
देशातील अनेक राज्यात अपघाताच्या मालिका घडत असतांना एक भीषण अपघाताची घटना उत्तर प्रदेशात हरदोई येथे घडली आहे. एका झोपडीवर वाळूने भरलेला ट्रक पलटी झाला असून घराबाहेर झोपलेल्या एकाच कुटुंबातील 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. आता कुटुंबात एकच मुलगी उरली आहे.
या भीषण अपघातात मृतांमध्ये पती-पत्नी, 4 मुले, जावई आणि नातवंडांचा समावेश आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. ट्रक चालक आणि हेल्परला ताब्यात घेण्यात आले आहे. बुधवारी रात्री दीड वाजता मल्लवन येथील जकात नाका क्रमांक दोनवर हा अपघात झाला.
अवधेश (४५), त्यांची पत्नी सुधा (४२), सुनैना (११), लल्ला (५), बुद्ध (४) आणि जावई करण (२५), त्यांची पत्नी हिरो (२२) आणि मुलगी कोमल (५) अशी मृतांची नावे आहेत. मल्लवान शहरात लोक उन्नाव रोडवर रस्त्याच्या कडेला झोपड्यांमध्ये राहतात. प्रत्यक्षदर्शीने सांगितले – आम्ही रात्री झोपलो होतो, तेव्हा अचानक ओरडण्याचा आवाज आला. धावत धावत अवधेशच्या घरी पोहोचलो.
संपूर्ण कुटुंब ट्रकखाली गाडल्याचे पाहिले. एक मुलगी जखमी अवस्थेत पडली होती. आम्ही पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जेसीबी पाचारण केले. यानंतर ट्रक सरळ करण्यात आला. वाळू काढण्यात आली. ट्रक जप्त करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. चालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे. बिट्टू या जखमी मुलीला सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती चिंताजनक आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. घटनेचा तपास करण्यात येत आहे.