जळगाव मिरर / १४ मार्च २०२३ ।
राज्यात काही ठिकाणी दिवसा कमाल तापमान 38 आणि 39 अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. तर दुसीरकडे रात्रीच्या वेळेला किमान तापमान अजूनही 15 ते 16 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. त्यामुळे दिवसा उकाडा आणि रात्री थंडी अशी वेगळी अवस्था राज्यातील काही भागात दिसून येत आहे. मार्च महिन्याच्या सुरवाती पासूनच उन्हाचा चटका वाढणार आहे.
राज्याच्या काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या संकटातून शेतकरी सावरतोय तोच आता आता पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. पुढचे 4 दिवस राज्याच्या काही भागात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 13 ते 16 मार्चदरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. तर विदर्भात 14 ते 16 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता असल्याने आता शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी या पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हातातोंडाशी आलेला घास पाऊस हिसकावून घेणार की काय? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. दरम्यान, हवामान बदलामुळे ढगांची गर्दी होऊन पावसासाठी पोषक वातावरण तयार होतंय. होळीच्या काळात पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी बरसल्या होत्या. अवकाळी पाऊस उतरल्यानंतर उकाडा मात्र अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शहरी भागात उन्हाचे चटके आणखी तीव्र होणार आहे.