जळगाव मिरर / २५ मार्च २०२३ ।
२०१९ मध्ये जगभर आलेल्या संकटामुळे आजही जगभरातील अनेक कंपन्यातील नोकरदाराना याचा फटका बसत आहे. आता पुन्हा एकदा जगावर मंदीचं सावट पसरलंय. जगभरातील मोठ्या कंपन्यांनी नोकरकपातीचा निर्णय घेतलाय. आयटी सेवा फर्म ऍक्स्चेंर, अॅमेझॉन, वॉलमार्ट अशा बड्या कंपन्यांनी पुन्हा एकदा नोकरकपातीचा बडगा उगारला आहे. त्यामुळे आता अनेकांच्या नोकरीवर गदा आल्याचं पहायला मिळतंय.
अॅक्सेंचरनं तब्बल 19 हजार नोकरकपात करण्याचा निर्णय घेतलाय. तर अॅमेझॉननं 9 हजारांहून अधिक नोकरकपात करण्याचा निर्णय याआधीच जाहीर केलाय. फेसबुकची पेरेंट कंपनी असलेल्या मेटानेही 10 हजार नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला होता. चॅलेंजर, ग्रे आणि ख्रिसमस सारख्या संस्थांनी दिलेल्या अहवालानुसार मार्च 2023 पर्यंत जवळपास 17 हजार 456 जणांना घरी पाठवलंय. पुढील काळात हा आकडा दुपटीने वाढण्याची शक्यता आहे.
बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मोठी नोकरकपात केल्याने सुशिक्षित तरुण बेरोजगार झाल्याचं पहायला मिळतंय. मंदीचे काळे ढग साचलेले असताना आता तरुणांच्या भविष्याचं काय होणार? असा सवाल विचारला जात आहे. सेल्सफोर्स इंक, अल्फाबेट, मायक्रोसॉफ्ट कॉर्प यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनी देखील नोकरकपात केली होती. दरम्यान, अमेरिकन अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे याचे तीव्र पडसाद जगभरात उमटताना दिसतायेत. मंदीमुळे बड्या कंपन्या अडचणीत सापडल्या आहेत. स्वाभाविकच याचा परिणाम भारतीय बाजारावरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहा, तुमची नोकरी सांभाळा, ही मंदी तुम्हाला बेरोजगारीच्या खाईत ढकलू शकते.