
जळगाव मिरर | ३० जुलै २०२४
देशात गेल्या काही दिवसापासून रेल्वे अपघाताच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच झारखंडच्या चक्रधरपूर विभागातील राजखर्सवान-बदाबांबो स्टेशनदरम्यान हावडाहून मुंबईला जाणाऱ्या मेलने मालगाडीला धडक दिली. बारांबूजवळ मंगळवारी पहाटे ३:४३ वाजता मालगाडीला धडकल्यानंतर हावडा-मुंबई मेलचे (१२८१०) २० डबे रुळावरून घसरले. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत.
हावडाहून मुंबईला जाणारी मुंबई मेल सोमवारी रात्री ११:२ वाजता ऐवजी २:३७ वाजता टाटानगरला पोहोचली. दोन मिनिटांच्या थांब्यानंतर ती पुढील स्टेशन चक्रधरपूरला रवाना झाली, परंतु ही ट्रेन पोहोचली नाही. पुढच्या स्टेशनला पोहोचण्याआधीच पहाटे ३:४५ वाजता बाराबांजवळ अपघात झाला. जमशेदपूरपासून सुमारे ८० किमी अंतरावर असलेल्या बाराबांसजवळ हा अपघात झाला. अपघातत मुंबई-हावडा मेलचे २२ पैकी २० डबे रुळावरून घसरले. यामध्ये १६ प्रवासी डबे होते, एक पॅन्ट्री कार होती, तर एक पॉवर कार होती. अपघातात सहा प्रवासी जखमी झाले. सध्या या घटनेत जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
या अपघातामुळे दक्षिण पूर्व रेल्वेच्या टाटानगर-चक्रधरपूर विभागातील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत. रेल्वे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी रुळ दुरुस्त करण्यासाठी आणि रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत.






















