जळगाव मिरर | २३ जून २०२५
राज्यातील सर्वात मोठा मुंबईमधील गोरेगाव फिल्मसिटीतील ‘अनुपमा’ मालिकेच्या सेटला सोमवारी सकाळी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये अनुपमा मालिकेचा सेट जळून खाक झाला आहे. घटनेच्या वेळी, अनेक कामगार आणि क्रू मेंबर्स सेटवर उपस्थित होते. परंतु सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सकाळी सात वाजता मालिकेचं शूटिंग सुरू होणार होतं. त्याच्या 2 तास आधी म्हणजेच सकाळी 5 वाजता सेटवर भीषण आग लागली आहे. सेटवरील आगीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनुपमाच्या सेटच्या आजूबाजूला असलेले इतर मालिकांचे सेट थोडक्यात वाचले आहेत. आग आणखी पसरली असती तर मोठा अनर्थ घडला असता.
या आगीची माहिती मिळताच अग्निशामन दल तात्काळ दाखल झाले. आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीमुळे ‘अनुपमा’ मालिकेच्या चित्रीकरणाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. निर्मात्यांनी अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास अग्निशमन दलाचे अधिकारी करत आहेत.
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन चे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी या आगीच्या घटनेची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. त्याचप्रमाणे फिल्मसिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुंबई कामगार आयुक्त यांचे त्वरित निलंबन करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
निष्काळजीपणा आणि चुकीच्या व्यवहारांमुळे निर्मात्यांकडून अग्निसुरक्षा नियमांची अंमलबजावणी केली जात नाही असाही आरोप करण्यात आला आहे. निर्माते, प्रोडक्शन हाऊस, टीव्ही चॅनेल, फिल्मसिटीचे संचालक आणि कामगार आयुक्त यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणीही AICWAने केली आहे.
