
जळगाव मिरर | ९ मे २०२६
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत डिझेल पुरवठ्याबाबत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून शहरातील डिझेल पुरवठ्यात ५ ते १० टक्क्यांची घट झाल्याची माहिती समोर आली आहे. या कपातीचा परिणाम आता थेट पेट्रोल पंपांवर दिसून येत असून अनेक ठिकाणी डिझेलसाठी वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः ट्रक चालक, मालवाहतूक करणारे व्यावसायिक आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनधारकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईतील विविध भागांतील पेट्रोल पंपांवर डिझेलचा साठा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्याने वाहनधारकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. काही ठिकाणी डिझेल पुरवठा नियमित वेळेपेक्षा उशिरा होत असल्याने पंप चालकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, पेट्रोलचा पुरवठा सध्या सुरळीत सुरू असल्याने पेट्रोल वाहनधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेल कंपन्यांनी सध्या औद्योगिक क्षेत्राला डिझेल पुरवठ्यावर अधिक भर दिला आहे. अनेक कारखाने, औद्योगिक प्रकल्प आणि व्यावसायिक यंत्रणांना नेहमीच्या कोट्यापेक्षा अधिक डिझेल पुरवले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील पेट्रोल पंपांसाठी उपलब्ध होणाऱ्या डिझेलच्या प्रमाणात घट झाली आहे. उद्योग क्षेत्राला वाढीव पुरवठा का केला जात आहे, याबाबत मात्र अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
कारखाने आणि औद्योगिक प्रकल्पांना दैनंदिन कामकाजासाठी मोठ्या प्रमाणावर डिझेलची आवश्यकता असते. यासाठी पेट्रोलियम कंपन्यांकडून त्यांना ठरावीक कोटा दिला जातो. मात्र, मागील काही दिवसांपासून या कोट्यापेक्षा अधिक इंधन पुरवठा करण्यात येत असल्याने शहरातील नियमित इंधन वितरण साखळीवर ताण वाढल्याचे चित्र आहे. परिणामी अनेक पेट्रोल पंपांवरील डिझेल साठा झपाट्याने कमी होत असून ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, या परिस्थितीचा सर्वाधिक फटका वाहतूक क्षेत्राला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना वेळेवर डिझेल न मिळाल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम बाजारपेठांमधील वस्तूंच्या वाहतुकीवर तसेच उद्योगांच्या उत्पादन प्रक्रियेवर होऊ शकतो. काही ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी डिझेल मिळवण्यासाठी अतिरिक्त वेळ आणि खर्च करावा लागत असल्याची तक्रार केली आहे.
तज्ज्ञांच्या मते, ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास वाहतूक खर्चात वाढ होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवरही होऊ शकतो. त्यामुळे डिझेल पुरवठा सुरळीत करण्यासाठी तेल कंपन्या आणि प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.






















