
जळगाव मरीर | १० जून २०२६

राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी आणि विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षात मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी येत्या १० ते १५ दिवसांत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना रोहित पवार यांनी ही घोषणा केली. पक्षाच्या संघटनात्मक रचनेत बदल करून नव्या चेहऱ्यांना आणि सामान्य कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देण्याचा पक्षाचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रोहित पवार म्हणाले की, “पुढील १५ दिवसांत पक्षात प्रमुख संघटनात्मक बदल करण्यात येतील. कोणत्याही मोठ्या नेत्याशी नाते नसलेले, घराणेशाहीशी संबंध नसलेले आणि पक्षासाठी सातत्याने काम करणारे सामान्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांना यावेळी संधी दिली जाईल. तळागाळातील कार्यकर्त्यांच्या कष्टाला न्याय देण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल.”
त्यांच्या या वक्तव्यानंतर पक्षातील आगामी बदलांबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पक्षातील जिल्हा, तालुका तसेच विविध आघाड्यांमध्ये नव्या नियुक्त्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच संघटन अधिक मजबूत करण्यासाठी युवा नेतृत्वाला संधी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा सुरू आहे.
दरम्यान, मुंबईतील वर्धापन दिन कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. शरद पवार यांनी यावेळी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत पक्षाच्या आगामी वाटचालीचा आढावा घेतला. संघर्षाच्या काळात कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या निष्ठेचे कौतुक करत त्यांनी संघटन बळकट करण्यावर भर दिला.
रोहित पवार यांच्या घोषणेमुळे आता पक्षात नेमके कोणते बदल होणार, कोणत्या पदांवर नव्या नियुक्त्या केल्या जाणार आणि कोणत्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात हे बदल पक्षासाठी कितपत फायदेशीर ठरतात आणि त्यामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





















