जळगाव मिरर | २७ एप्रिल २०२४
तालुक्यातील मन्यारखेडा शिवारातील साईनगरात राहणाऱ्या ममता रतिलाल राठोड (वय ३०) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी दि. २५ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, विवाहितेने आत्महत्या केली नसून तीच्या पतीने गळफास दिल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्यांकडून करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा शिवारातील साईनगर येथे ममता राठोड या महिला आपल्या पती रतीलाल भोजू राठोड आणि एक मुलगा आणि मुलगी यांच्यासोबत वास्तव्याला होत्या. मोलमजूरी करून त्या आपला उदरनिर्वाह करत होत्या. दरम्यान, गुरूवार दि. २५ एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास विवाहितेने राहत्या घरात साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनी धाव घेत खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विवाहितेने आत्म्हत्या केल्याची माहिती मिळताच तिच्या माहेरच्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी मनहेलावणारा आक्रोश केला होता. विवाहितेच्या पश्चात मुलगा प्रितेश, मुलगी निधी, आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे.