जळगाव मिरर / १७ एप्रिल २०२३ ।
राज्यात नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी देशाचे मंत्री अमित शहा यांची उपस्थिती होती. याच कार्यक्रमात रविवारी सोहळ्यानंतर उष्माघातामुळे 12 जणांचा मृत्यू झाला. तर 600 हून अधिक जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याचे समोर आले आहे. यावर आता सर्वच विरोधकांनी सत्ताधारीवर टीका सुरु झाली आहे. यात राज ठाकरे यांनी सुद्धा सरकारला प्रश्न विचारले आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेली घटना दुर्दैवी आहे. हा सोहळा सायंकाळी का घेण्यात आला नाही? सरकारला काहीच कळत नाही का?, अशा तिखट शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या घटनेवरून राज्य सरकारवर टीका केली. सध्या 71 श्रीसेवकांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कामोठीतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या श्रीसेवकांना भेटून आल्यानंतर राज ठाकरेंनी ही माहिती दिली.
काय म्हणाले राज ठाकरे?
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा संध्याकाळी का नाही घेतला, प्रशासनाला इतकंही कळत नाही का? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कारानंतर उष्माघातामुळे कामोठीतील रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या श्रीसेवकांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी. ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. राज ठाकरेंनी रुग्णालयात असणाऱ्या सेवकांची विचारपूस करण्यासाठी कामोठीतील एमजीएम रुग्णालयात भेट घेतली. त्यापूर्वी त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली.