
जळगाव मिरर | २१ एप्रिल २०२५
राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले तर मी पेढे वाटेन, असे उपरोधिक विधान सत्ताधारी शिवसेनेचे बडे नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरु झाली आहे.
उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चेमुळे अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. हे दोघे बंधू खरेच एकत्र आले तर त्याचा मोठा फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी उपरोक्त विधान केले आहे. पत्रकारांनी शिरसाट यांना दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास तुम्हाला (शिवसेना) धोका आहे का? असा प्रश्न केला असता ते म्हणाले, दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आम्ही पेढे वाटू. ते एकत्र आले तरी त्याचा आम्हाला कोणताही धोका नाही. आमच्या सत्तेला कुठेही धक्का लागणार नाही.
ते पुढे म्हणाले, राज ठाकरे यांनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याची हाक दिली. पण त्याला उद्धव ठाकरे यांनी हवा तसा प्रतिसाद दिला नाही. राज ठाकरे यांचा संदेश आम्हाला समजतो. त्यांचा संदेश न समजायला आम्ही दुधखुळे नाही. तु्म्ही युता करा. त्यानंतर आत्महत्या करण्याची वेळ कुणावर आली हे कळेल. हे चांडाळ चौकडी असणारे लोक केव्हाच युती होऊ देणार नाही. ठाकरेंची युती झाल्यास आपले अस्तित्व संपेल अशी त्यांना भीती वाटते.
राज ठाकरे यांनी कुणाचाही पाठिंबा नसताना पक्ष मोठा केला. सांभाळला. पण हे लोक सत्तेसाठी लाचार आहेत. ते प्रत्येकाच्या घरी फिरत आहेत. पक्षात लाचारांची फौज तयार झाल्यामु्ळे त्यांची ही अवस्था झाली आहे. ते काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले. पण आता त्यांना तिथे लाथा खाव्या लागत आहेत. त्याचा त्यांना आता पश्चाताप होत आहे.





















