जळगाव मिरर । १९ नोव्हेबर २०२२
जुन्या भांडणाच्या कारणावरून चौघांनी पिता-पुत्रास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अजिंठा साई दरबार चौफुलीजवळील साई ढाब्यामध्ये घडली. विजय दयाराम सूर्यवंशी (५०) व निखिल सूर्यवंशी (दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी) अशी जखमी पिता-पुत्रांची नावे आहेत.
रामेश्वर कॉलनीतील विजय सूर्यवंशी यांचा अजिंठा चौफुली येथे साई दरबार नामक ढाबा आहे. बुधवारी रात्री ८ वाजता सूर्यवंशी यांचा मुलगा निखिल ढाब्यावर होता. त्यावेळी शाम शंकर कोळी, संतोष पाटील यांच्यासह आणखी दोन जण ढाब्यावर आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून निखिल याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर तीक्ष्ण हत्याराने निखिलच्या कपाळावर आणि डोक्यावर वार केले. हा प्रकार ढाब्यावरील कारागीर याने विजय सूर्यवंशी यांना सांगितला. सूर्यवंशी यांनी ढाबा गाठून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला; मात्र, चौघांनी त्यांनासुद्धा मारहाण केली. गुरुवारी विजय सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.