जळगाव मिरर | ४ मार्च २०२४
देशातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आतापासून महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. तर महायुतीच्या नेत्यांनी जागा वाटपाबाबत आम्हाला सांगावे, अन्यथा आम्ही आमचा स्वतंत्र निर्णय घेऊ, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी दिला आहे.
ज्याप्रमाणे भाजपसाठी लोकसभा महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे आमच्यासाठी विधानसभा निवडणूक महत्त्वाची असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. त्यामुळे महायुतीमधील इतर लहान घटक पक्षांसोबत चर्चा करून आम्हाला कशा पद्धतीने सोबत घेऊन जाणार आहात? जागा वाटपाबाबत काय निर्णय होणार? हे आधी स्पष्ट करावे, असे देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी आमच्यासारख्या लहान पक्ष सोबत चर्चा करायला हवी, जेणेकरून आम्हाला कशा पद्धतीने ते सोबत घेणार घेणार आहेत, हे स्पष्ट होईल असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघावरून सध्या महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा या भारतीय जनता पक्षात प्रवेश करून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची चर्चा आता समोर आली आहे. त्यामुळेच नवनीत राणा आता भाजपचा झेंडा हाती घेणार असल्याचे स्पष्ट होत आहे. नवनीत राणा यांनी आधी हिरवा, भगवा आणि निळा झेंडा घेऊन निवडणुकीचा सामना केला होता. मात्र, आता नवनीत राणा भगवा झेंडा घेऊन निवडणुकीत लढण्याच्या तयारीत असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. नवनीत राना या आता हिंदू शेरनी झाल्या आहेत. त्यामुळे भाजप आता नवनीत राणा आणि रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष देखील संपवणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. भाजपमध्ये जाऊन त्यांचा स्वाभिमान संपायला नको, असं देखील बच्चू कडू म्हणाले.