
जळगाव मिरर | ३ मे २०२६
विजेच्या क्षेत्रात कालच्या कामगिरीवर आज तगू शकत नाही. त्यासाठी विविध माध्यमातून महावितरणचा महसूल आणखी वाढवून वीजबिलांची थकबाकी शून्य करणे आणि ग्राहकांना सातत्यपूर्ण दर्जेदार सेवेस सर्वोच्च प्राधान्य देऊन दैनंदिन कामकाज अधिक गतिमान करा, असे आवाहन महावितरणचे संचालक (मा.सं.) श्री.राजेंद्र पवार यांनी केले.
बहुजन विद्युत अभियंता, अधिकारी व कर्मचारी फोरमच्या जळगाव परिमंडलाच्या वतीने शनिवारी (2 मे) चाळीसगाव येथे आयोजित वीज कर्मचारी प्रबोधन मेळाव्याचे उद्घाटक म्हणून संचालक (मा.सं.) श्री.पवार बोलत होते. यावेळी आमदार मंगेश चव्हाण, मुख्य अभियंता इब्राहिम मुलानी, अधीक्षक अभियंता विनोद पाटील, सायस दराडे, फोरमचे केंद्रीय अध्यक्ष धर्मभूषण बागुल, सरचिटणीस एम.बी. अहिरे, कार्याध्यक्ष विजय सोनवणे, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक खनाडे, माजी आमदार साहेबराव घोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.पवार म्हणाले की, वर्षभरात मानव संसाधनाच्या माध्यमातून विविध ऐतिहासिक निर्णय, कर्मचारी कल्याणकारी योजनांना सुरुवात केली. यात 20 व्या वर्धापन दिनानिमित्त राबवलेले विद्युत सुरक्षा अभियान देशातील पहिलेच मोठे लोकसहभागाचे अभियान ठरले. एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्ससह 4 जागतिक संस्थांनी त्याची नोंद घेतली. तांत्रिक कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने देण्याची प्रक्रिया पेपरलेस केल्याने कामात पारदर्शकता आणि वेग आला. कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा गौरव करण्यासाठी व्यवस्थापनाने भरीव आर्थिक तरतुद केली. गुणवंत कामगार पुरस्काराची रक्कम वाढवून कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आमंत्रित करण्याचा जिव्हाळ्याचा निर्णय घेतला.
‘शून्य विद्युत अपघात’ हे ध्येय गाठण्यासाठी दर सोमवारी सर्व उपविभाग व शाखा कार्यालयांत कामाची सुरुवात ‘विद्युत सुरक्षा शपथेने’ करणे अनिवार्य करण्यात आले. प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी व नावीन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ देण्यासाठी व्यवस्थापन आणि संघटना प्रतिनिधींचया नियमित बैठकास सुरुवात केली. हरित ऊर्जेला बळकटी देण्यासाठी कर्मचाऱ्यांना सौर ऊर्जा आणि ई-वाहन खरेदीसाठी आगाऊ रक्कम दिली जात आहे. ग्राहकसंख्येनुसार महावितरणच्या रचनेत ऐतिहासिक बदल करण्यात आला. नवीन कार्यालये व पदे निर्माण केली. कामाचे समान वाटप झाल्यामुळे अभियंते व कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी झाला. त्याचप्रमाणे पाल्यांची शिष्यवृत्ती, मेडिक्लेम आणि गंभीर आजारांसाठी मिळणाऱ्या मदतीत कर्मचारी कल्याण निधीच्या माध्यमातून दुप्पट वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. आंतरकंपनी क्रीडा आणि नाट्य स्पर्धा पुन्हा सुरू करण्यात आल्या.
श्री.पवार म्हणाले की, सौर ऊर्जा क्षेत्रात महावितरणने आघाडी घेतली आहे. जगातील सर्वात मोठ्या 16 हजार मेगावॅटच्या विक्रेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्पांची ‘मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0’ मधून 12 लाख 82 हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुरू आहे. मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत महाराष्ट्रात 9 लाख 17 हजार सौर कृषिपंप बसवण्यात आले. देशातील 64 टक्के सौरपंप केवळ राज्यात आहेत. एकाच महिन्यात सर्वाधिक 45 हजार 911 सौर कृषिपंप बसवण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपण केला. पीएम-सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात साडेपाच लाख घरगुती ग्राहकांकडे 2052 मेगावॅटचे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होऊन त्यांचे वीजबिल शून्यवत झाले.
श्री.पवार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या वीज क्षेत्रात क्रांतिकारी आणि सकारात्मक बदल घडत आहेत. महावितरणला भांडवली बाजारात ‘आयपीओ’ आणण्यास मान्यता मिळाल्याने महावितरणची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कृषी व अकृषक वीज वितरणासाठी दोन स्वतंत्र कंपन्या केल्या जाणार आहेत. या बदलांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी, उद्योजक आणि घरगुती वीज ग्राहकांना स्वस्त, स्थिर, सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे. याबाबत सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा.लोकेश चंद्र यांनी सकारात्मक भूमिका मांडली आहे. यामुळे कामकाजात किंवा कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तींमध्ये कोणताही बदल होणार नाही. फेब्रुवारीमध्ये संघटना पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत वीजबिल थकबाकी वसुलीबाबत सादरीकरण केले होते. त्यास चांगला प्रतिसाद देऊन सर्वांनी निष्ठेने आणि जिद्दीने ते काम केले हे कौतुकास्पद आहे. मात्र वीज क्षे त्रात मागील कामगिरीवर अवलंबून राहून चालत नाही. नव्या आर्थिक वर्षात सर्व कर्मचारी आणखी ताकदीने आणि एकजुटीने काम करून प्रत्येक आघाडीवर कार्यक्षमतेचा नवा मानदंड तयार करतील, अशी अपेक्षा श्री. पवार यांनी व्यक्त केली.
फोरमचे केंद्रीय अध्यक्ष धर्मभूषण बागुल यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त श्री.पवार यांनी त्यांचा सत्कार केला. महाराष्ट्राच्या कामगार चळवळीचा ऐतिहासिक वारसा श्री.बागुल यांनी जपल्याचे गौरवोद्गार श्री.पवार यांनी काढले. यावेळी फोरमचे मुख्य संघटक भगवान नाईक, सहसचिव भाऊसाहेब गांगुर्डे, उपाध्यक्ष भारत मुंडे, सहसचिव मिलिंद जाधव, प्रसिद्धीप्रमुख किरण दोंदे उपस्थित होते. प्रास्ताविक विजय सोनवणे यांनी केले.






















