
जळगाव मिरर | १७ जून २०२४
शस्त्राचा धाक दाखवित वृद्धाजवळील दोन हजारांची रोकड जबरीने हिसकवून नेणारे तिघे असोदा ते तरसोद रस्त्यावरील जंगलात लपून बसलेले होते. एलसीबीच्या पथकाने रात्रभर शोध मोहीम राबवित संशयित वैभव विजय सपकाळे (वय १९), कल्पेश निलेश इंगळे (वय १९) आणि दिपक धनराज सपकाळे (वय २० तिघे रा. आसोदा ता. जळगाव) या तिघांच्या जंगलातून मुसक्या आवळल्या. त्यांना तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील असोदा गावातील वाल्मीक अंकात बिऱ्हाडे (वय ७२) हे ग्रामपंचायत परिसरात बसलेले असतांना दि. १४ जून रोजी गावातील वैभव विजय सपकाळे हा दुचाकीवर वाल्मीक यांच्याजवळ आला. त्यावेळी त्याच्यासोबत गावातील कल्पेश निलेश इंगळे व दिपक धनराज सपकाळे हे देखील आले. तेव्हा वैभव विजय सपकाळे याने वाल्मीक जवळ १ हजार रुपयाची मागणी केली. पैसे न दिल्याचा राग आल्याने कल्पेश निलेश इंगळे (माळी) याने धारदार शस्त्र मानेला लावून वृद्धाच्या खिशातून दोन हजरांची रोकड जबरीने हिसकावून तेथून पसार झाले होते. याप्रकरणी तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फरार असलेल्या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पुढील कार्यवाहीसाठी तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अटकेतील तिघांविरुद्ध हाणामारी, जबरी चोरी व मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असून ते पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित हे पसार झाले होते. तिघ संशयित असोदा ते तरसोद दरम्यान, असलेल्या जंगातील मंदिराजवळ लपून बसल्याची माहिती एलसबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोहेकॉ राजेश मेंढे, जितेंद्र पाटील, बबन पाटील, भारत पाटील यांचे पथक रवाना केले. पथकाने रात्रभर शोधकार्य राबवित पहाटेच्या सुमारास मंदिराच्या परिसरात झोपलेल्या तिघांच्या मुसक्या आवळल्या





















