जळगाव मिरर / ९ मार्च २०२३ ।
राज्यातील शिवसेना पक्ष फुटीच्या मुद्यावरुन शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा लगावला. शिवसेना फोडून भाजपने महाराष्ट्रावर आघात केल्याचे राऊत म्हणाले. भाजपकडून जर मैत्रीचा हात आला तर तो स्वीकारणार का? असा प्रश्नही प्रसारमाध्यमांनी राऊतांना विचारला. यावेळी ते म्हणाले की, भाजपबरोबर अजिबात हातमिळवणी करणार नाही. हे मी स्पष्टपणे आणि परखडपणे सांगत असल्याचे राऊत म्हणाले.
राजकारणामध्ये मतभेद होत असतात. काही वेळेला टोकाचे मतभेदही होतात. यापूर्वी अनेक पक्षातही झाले. आमचेही अनेकवेळा मतभेद झाले आहेत. पण तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला पक्ष फोडता आणि चोर आणि लफंगांच्या हातावर ठेवता, कोण तुम्हाला माफ करेल असेही संजय राऊत म्हणाले.
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन आहे. यानिमित्त त्यांनी शुभेच्छा देणार का? असा सवाल संजय राऊतांना प्रसारमाध्यमांनी केला. यावेली राऊत म्हणाले की, या महाराष्ट्रात प्रमुख पदावर काम करणारे सगळेच लोक हे शिवसेनेतच होते. शिवसेना आणि बाळासेहब ठाकरे नसते तर आपण कुठे असतो याची उजळणी आणि याचं आत्मचिंतन प्रत्येकानं केलं पाहिजे असे संजय राऊत म्हणाले. मूळ शिवसेना जागेवरच आहे. शिवसेना फोडून भाजपनं मोठा गुन्हा केला आहे. राज्याची जनता या वेदना कधीही विसरणार नाही. हा महाराष्ट्राच्या काळजात घुसलेला ‘बाण’ असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत यांनी केलं. हे महाराष्ट्रातील जनता आणि शिवसेना विसरणार नसल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणारा पक्ष केंद्रीय तपास यंत्रणा आणि पैशाचा वापर करुन भाजपने फोडला आहे. हा महाराष्ट्र राज्यावर केलेला आघात असल्याचे राऊत म्हणाले.