
जळगाव मिरर | २० एप्रिल २०२५
कालपासून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोर धरत असतांना यावर आता अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देणे सुरु केले आहे.
या सगळ्या घडामोडीवर आता भाजप विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी ठाकरे बंधूंना जोरदार टोला लगावला आहे. ठाकरे बंधूंना आता एकमेकांची राजकीय गरज निर्माण झाली आहे. म्हणून त्यांचा एकत्र येण्याचा प्रयत्न असू शकतो. तसेच महाराष्ट्राचे हित पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार भक्कम आहे, असा टोला भाजप विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.
प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे हित मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार कशा पद्धतीने जपत आहे, हे आपण पाहतोय, विकास गतीने होतोय. आज सकारात्मक बोलणारे संजय राऊत हे काल-परवा काय बोलत होते, हे सर्वांनी पाहिलेय. त्यांचे कुठलेही वक्तव्य स्थिर नसते, त्यामुळे ते गांभीर्याने घेण्याची गरज वाटत नाही, असा प्रवीण दरेकर यांनी म्हटले.






















